मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

आज आपल्या पैकी खूप जणांना नीरजा भनोत कोण हेही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय वीरांगना होती, जिने १९८६ साली  तिच्या स्वतःच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची “अशोक चक्र” हे  वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयीप्रमाणे या विरांगनेला  विसरून गेले. 

नीरजा भनोत ही हरीश भनोत, या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि ‘PAN AM 73‘ या एयरलाइन्स कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 

५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तानमधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या PAN AM 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान इस्राइलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकावयाचे होते. 

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून अमेरिकन प्रवाशांना निवडून, मारायची धमकी देवून, ते पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. 

नीरजाने पासपोर्ट गोळा केले, पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले. 

नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरवले आणि त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रके प्रवाशांपर्यंत पोहोचविली. तिने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे  सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. 

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार, इतक्यात तिला एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलाला  शोधून विमानाच्या बाहेर पडत होती, तेवढ्यात तो चौथा अतिरेकी तिच्यासमोर आला. तिने त्या मुलाला आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाशांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. 

नीरजाने वाचविलेला तो लहान मुलगा मोठा झाल्यावर वैमानिक झाला. स्वतःच्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “ माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.” 

भारताने नीरजाला “ अशोक चक्र “ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने  तिला “ तमगा-ए-इन्सानियत “ हा सर्वोच्च पुरस्कार दिला. 

अमेरिकेने “ जस्टिस फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड “ हा वीरता पुरस्कार देवून तिला सन्मानित केले.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈