मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाई माणूस…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाई माणूस…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

‘ब्राईट ईन्डिया साॅफ्टसोल्यूशन्स प्राईव्हेट लिमिटेड’.

येस्स… मी इथेच काम करतो. ॲन्ड , आय ॲम प्राऊड ऑफ ईट.

फायनल ईयरला, कॅम्पस मधनं सिलेक्ट झालो. आता दोन वर्ष होत आलीयेत. खरंच.. कळलंच नाही, कधी दोन वर्ष संपलीयेत ती. आय.टी. ईन्डस्ट्रीत राहून सुद्धा, ही कंपनी टोटली वेगळीये. नो पाॅलीटीक्स. हेल्दी वर्क कल्चर. डेडलाईन्सचा अतिरेक नाही. कामाची कदर करणारी लोकं. चांगलं काम केलं की, पटाटा मिळणारी ईन्क्रीमेंटस्.

बाॅस… बाॅस वाटलाच नाही कधी. जस्ट लाईक एल्डर ब्रदर. चांगलं काम करवून घेणारा. चुकलात, धडपडलात, तरी पाठीशी ऊभा राहणारा. सांभाळून घेणारा. स्वतःहून काही चांगल्या टिप्स देणारा. पुढं कसं जायचं ? हार्ड वर्क पेक्षा, स्मार्ट वर्क कसं करायचं ? हातचं न राखता सांगायचा. एखादवेळी रात्र कंपनीत काढायची वेळ आलीच तर आमच्या जोडीला तोही थांबायचा.

प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला की, सेलीब्रेशन. मनापासून. कुठंतरी महाबळेश्वर, नाहीतर लोणावळा, खंडाळा. टाॅपक्लास रिसाॅर्टमधे. सॅटरडे सन्डे. दोन दिवस फूल टू एन्जाॅय. पार्टीत आमच्याबरोबर धमाल नाचायचा सुद्धा. कूऽऽल. मन्डेपासून नव्या दमानं आम्ही नवा प्रोजेक्ट सुरू करायचो.

आमच्या ग्रुपमधे आम्ही चार पोरं आणि दोन पोरी. सगळी बॅचलर्स गँग. रूमवर टाईमपास करण्यापेक्षा, ऑफीस बरं. आम्ही जास्तीजास्त वेळ ऑफीसमधेच पडीक असायचो. खूप शिकायला मिळालं.

खरं सांगू ? मेसपेक्षा कंपनीचं कॅन्टीन बरं वाटायचं. आठवड्यातून तीनदा तरी रात्रीचं जेवण कंपनी कॅन्टीनमधेच व्हायचं. पोरींचं तसं नसायचं. सातच्या ठोक्याला त्या पळायच्या.

काहीही असो. आमचं वर्कोहोलीक असणं, बाॅसचं सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, त्याचा टॅलेन्ट, आमचं हार्डवर्क. प्रोजेक्ट डेडलाईनच्या आतच, कम्प्लीट व्हायचा. कंपनी खूष होती आमच्या टीमवर्कवर.

अचानकच. मन्डे ईव्हीनींग. बाॅस म्हणाला, “आज रात्री सगळे माझ्या घरी डिनरला या.” गेलो. ग्रुपमधल्या पोरीही होत्या. 

बाॅसची बाॅस. त्याची बायको. तीनं आमच्या गँगला मनापासून एन्टरटेन केलं. जेवण छानच. गप्पा मारल्या.

ती.. बाॅसनं ओळख करून दिली. “म्रिनाल. माय कझिन. आय. बी. एम. यू.ऐस. ला असते. पण कंटाळलीय तिकडे. लवकरच परत येईल इकडे.”

आम्ही पहातच राहिलो. वेड्यासारखं… नो डावूट. ती फेअर होतीच. पण तिचं स्माईल.  जबरा. आमच्या गँगमधल्या पोरांचे, ईसीजी काढावे लागले असते. धकधक..

तीनं हात पुढं केला. प्रत्येकाचा हात हातात घेवून शेक हॅन्ड केलं तीनं. तीचा स्पर्श झाला अन्… 11 के. व्ही.चा शाॅक बसला. कुछ कुछ… बहोत कुछ होने लगा.

ती प्रत्येकाशी बोलली. नेटिव्ह टाऊन, काॅलेज, हाॅबीज, गर्लफ्रेन्ड, बाॅयफ्रेन्ड, फ्युचर प्लॅन्स… सबकुछ. आम्ही हिप्नोटाॅईज्ड झालेलो. सब कुछ ऊगल दिया.

रात्रीचे अकरा वाजत आलेले. आमच्या गँगमधल्या पोरी अस्वस्थ. आम्ही.. आम्हाला वाटत होतं, ये मुलाकात खतमही ना हो.

एकदम बाॅसने बाॅम्ब फेका. मार डाला. “फ्रेन्डस्, आय ॲम रिझायनिंग. शिफ्टींग टू सिंगापोर. फ्राॅम टूमारो आय विल नाॅट बी देअर अराऊंड यूवर डेस्क. बेस्ट लक फाॅर युवर फ्यूचर. स्टे ट्यून्ड गाईज.”

आम्ही बैलासारख्या माना डोलावल्या. बुरा लगा. मनापासून वाईट वाटलं. आम्ही थोडं ईमोशनल झालेलो. बाॅसला हातात हात घेवून बेस्ट विशेस दिल्या. निघालो. खाली आलो.

म्रिनाल तिच्या गाडीपाशी. पोरींना ती ड्राॅप करणार होती. एकदम माझ्याकडे वळून म्हणाली. “तू त्याच एरियात राहतोस ना. चल, तुला ड्राॅप करते.”

मी टुणकन ऊडी मारून तिच्या गाडीत. ड्रायव्हींग सीटशेजारी. तीची मरून होंडा सिटी. कारमधला अफलातून फ्रेग्रन्स. तीचं असणं. मोतीदार दात दाखवत, हसून बोलणं. बॅग्राॅऊंडला जगजीतसिंगाचं गजल गाणं.. अहाहा…

साला, माझं घर फार पटकन् आलं. मी तिला बाय केलं. ईन्फानाईट टाईम्स, तिच्या पाठमोऱ्या गाडीकडे बघत बसलो. 

नेक्स्ट माॅर्नींग. बाॅस की बिदाई. आँखो में आंसू.

व्हेरी नेक्स्ट माॅर्नींग. नये बाॅस की मुँहदिखाई.

अर्थक्वेक झालेला. म्रिनाल ईज आवर न्यू बाॅस.

पुन्हा आँखों में आंसू. खुशी के आंसू. सरप्राईज के आंसू. सगळ्या पोरांचा देवावरचा विश्वास एकदम वाढला. भगवान, तेरी लीला अगाध है ! आणि म्रिनाल भी.

मुद्दामहून बाॅसच्या घरच्या पार्टीला येणं. स्वतःची ओळख लपवणं. आमची कुंडली काढून घेणं.. येस बाॅस.. मान गये.

हल्ली आम्ही जरा ब्युटी काॅन्शस झालेलो. भांगाच्या रेघा काढणं वाढलं. हजामाचं बिल वाढत गेलं. जीन्स पिदाडणं कमी झालेलं. फाॅर्मल्समधे वावरणं वाढलं. काहीही असो.. आमच्या ऑफीसचा स्वर्ग झालेला. तरीही. म्रिनालचं वेगळेपण जाणवायचं.

पहिल्या दिवशीच तीनं सांगितलं. “काॅल मी म्रिनाल. जस्ट म्रिनाल.”

ती प्रचंड हुशार. तितकीच मेहनती. सतत नवीन काहीतरी शिकायच्या मागे. तीचं नाॅलेज नेहमी अपटू डेट असायचं. आमच्याबरोबरही ती ते शेअर करायची. हळूहळू आम्हालाही ती सवय लागली. शक्यतो कुणी ओव्हरटाईम करावा, असं तिला वाटत नसे. एरवीचा टाईमपास बंद झाला. सहा वाजेपर्यंत आमचं काम आवरायचं.

अर्थात पहिल्या बाॅसईतकीच ती हेल्पींग नेचरवाली. व्यवस्थित गाईड करायची. छोटी छोटी टारगेटस् ठेवायची. डे टू डे टार्गेट. आम्ही ते कम्प्लीट करायच्या मागे लागायचो. प्रोजेक्टचा लोड जाणवायचाच नाही.

बाकीचंही ती भरपूर वाचायची. एखादं चांगलं बेस्टसेलर रेफर करायची. आम्ही वाचायचो. फ्रेश वाटायचं.

ती स्वतः खूप हेल्थ काॅन्शस होती.

जिम करायची. भरपूर वाॅक घ्यायची. गिटार वाजवायची. स्वतःला फ्रेश ठेवायची.

आम्ही काय ? काॅपी पेस्ट करायला टपलेलोच. जागरणं कमी झाली. अचरट चरबट खाणं कमी झालं. जिम सुरू झाली. आम्हीही हेल्थ काॅन्शस झालो. ऑफिसमधल्या स्मोकींग झोनच्या वार्या कमी झाल्या. ओव्हरऑल, हळूहळू ॲज अ पर्सन आम्ही डेव्हलप होत गेलो.

म्रिनाॅल वाॅज स्ट्राँग मॅग्नेटिक फिल्ड. आणि … ऑल वुई वेअर अन्डर ईन्फ्ल्युएन्स ऑफ ईट. ती सुंदर होतीच. अजून सुंदर वाटायला लागली.

वाटायचं की, आपण स्वतःला तिच्यासारखं डेव्हलप करायला हवं.

म्रिनाल वाॅज नो मोअर अ ब्युटी क्वीन. बट नाऊ शी हॅज बिकम आयडाॅल. आणि आम्ही सगळे तिला काॅपी करत होतो. तरीही छान वाटत होतं.

प्रोजेक्ट संपत आलेला. यू. ऐस. चा क्लायंट. दिवाळी दोन दिवसावर. म्रिनालनं त्याला ठणकावून सांगितलं. “दिवाळीत जमणार नाही. तुम्ही ख्रिसमसला काम करता का ? हे तसंच आहे.”

काही क्वेरीज होत्या. आज रात्री थांबावंच लागणार. म्रिनाल म्हणाली ,  “सगळे नकोत, कुणीतरी दोघं थांबा.”

मी आणि गार्गी तयार झालो. संध्याकाळी सहाला बाकीची लोकं गेली.

हॅपी दिवाली. आमची नाईट शिफ्ट सुरू.

रात्रीचे दोन वाजत आलेले. मी म्रिनाल आणि गार्गी. तिकडे तो राॅबर्ट. चुन चुन के प्रत्येक क्वेरीचा फडशा पाडला. टेस्टेड ओके. मिशन कम्प्लीटेड.

जरा रिलॅक्सलो. तेवढ्यात म्रिनाल आमच्या दोघांसाठी स्वतः काॅफी घेवून आली. खूपच छान वाटलं. आमच्या दोघांच्या पाठीवर थोपटलं. “वेल डन. नाऊ ईटस् रिअली अ हॅपी दिवाली.”

खरं तर खूप भूक लागलेली. असं वाटेपर्यंत म्रिनालनं तिच्या टिफीनमधली सॅन्डविचेस काढली. और मोतीचूर का लड्डू भी. मजा आली.

आम्ही तिघं निघालो. खाली आलो तर, म्रिनालचा नवरा त्याची कार घेवून आलेला. त्याच्याशी ओळख करून दिली.

तिच्यासारखाच. हुशार, हॅन्डसम. बिलकुल फॅक्टर जे नाही वाटलं. शी रिअली डिझर्व्हस् ईट. 

त्याच्या गाडीतून मी रूमपर्यंत. रूमवर पोचलो. रूमपार्टनरनं विचारलं.

“साल्या, तुझं कामात लक्ष कसं लागलं ?

एवढ्या सुंदर दोन पोरी शेजारी होत्या. मी पागल झालो असतो.”

मला त्याच्या पागलपणाची कीव वाटली. खरंच.. कामात इतकं हरवलेलो. त्यांचं बाईपण कधीच विसरलेलो.

म्रिनाल दोन एक वर्ष आमच्या इथे होती. आता बरीच वर्ष बंगलोरला.

गार्गी. माय कलीग ॲन्ड नाऊ माय वाईफ. आम्हाला नेहमी म्रिनालची आठवण येते. आज जे काही थोडं फार अचिव केलंय, क्रेडिट गोज टू म्रिनाल.

आजही कुठली यंग चार्मींग लेडी दिसली की, काय वाटतं सांगू ? ही म्रिनालसारखी हुशार असेल. ती भरपूर वाचत असेल. नाहीतर गिटार वाजवत असेल. ओव्हरऑल, तिच्या सुंदर दिसण्यापेक्षाही, ती खरंच जास्त सुंदर असेल.

माझी नजर सुधारलीय. सुंदर बाईमाणूस दिसली की हल्ली माझं त्यातल्या माणसाकडे जास्त लक्ष जातं. त्या स्वच्छ नजरेला बाईपणाचा मोतीबिंदू होत नाही.

परवा एकदम म्रिनालची आठवण झाली. आठ मार्च होता. फोन केला. आम्ही दोघंही बोललो. “हॅपी वुमन्स डे, म्रिनाल.”

ती तिकडून हसली. “वीई शुड सेलीब्रेट ह्युमन्स डे. देन विमन्स डे विल बी सेलीब्रेडेड एव्हरी डे !”

काय बोलणार ?

“ओके म्रिनाल , हॅपी ह्युमन्स डे !”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(२० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त खास हा लेख) 

तो दिवस मला आजही आठवतोय. मला रात्री अचानक एक वाजता फोन आला. मी भर झोपेतून खडबडून जागा झालो होतो. मोबाईल हातात घेतला व नंबर पाहीला तर तो परदेशी कॉल असल्याचे समजले. मी मोबाईल रिसिव्ह केला व हॅलो बोललो. समोरून एक महिला बोलत होती व डिस्टर्ब केले म्हणून क्षमा मागत होती. आपण कोठून बोलताय विचारले तर अमेरिकेतून बोलत आहे असे सांगितले. काय विशेष विचारले तर त्या सांगू लागल्या की आपला चिमण्यांविषयी संभाषणाचा इको फ्रेंडली क्लब वरील फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ पाहीला व तो खुपचं भावला व रहावलेच नाही म्हणून आपणास फोन केला. पुढे त्या बोलू लागल्या व त्यांची त्यातील काही वाक्य मात्र काळजाला भिडणारी होती व त्या वाक्यांनी माझ्या शरीरावरील रोम खडे झाले होते. त्या सांगत होत्या पुण्यामध्ये माझे लहानपण गेले अगदी लग्न होईपर्यंत मी तेथे  खुप खेळले बागडले. वडीलांनी घराच्या आवारात पक्षांसाठी खुप झाडे लावली होती. ते पक्षी पाहुन त्यांच्या विषयी खुप कुतुहल वाटायचे.  त्यांच्या प्रेमात मी कधी पडले समजलंच नाही. या प्रेमाचे रूपांतर आमचे मैत्रीत झाले. त्यांना मी रोज खाण्यासाठी धान्य टाकायची. त्या सुरूवातीला धान्य टाकताच क्षणी उडून जायच्या व मी तेथून निघून गेले की मग टाकलेले धान्य टिपुन खायच्या. या खेळात मी व त्या अगदी फार जवळ जवळ येत गेलो. आता त्या माझ्या हातात धान्य पाहीले की कधी कधी हातावरच येऊन बसायच्या. धान्य टाकायला उशीर झाला की जोर जोराने चिवचिवाट करायच्या. अगदी मुलाने हट्ट करावा तशा त्या हट्टी होत चालल्या होत्या. मी कुमारीका अवस्थेत आता या चिमण्यांची आई झाले होते. त्यांच्या जेवण पाण्याची काळजी मी रोज घेत असे व त्यांच्याशी संवाद साधत असे. मला माहीत नाही पण कोणत्या जीवनाची हि पुण्याई कामी आली होती माहीत व यांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले होते.

पुढे माझे  शिक्षण पूर्ण झाले. आई वडीलांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पतीसोबत अमेरीकेला रहायला गेले. चिमण्याचा सहवास मिळत नसल्याने मी पहिले खूप उदास व्हायची. कधी कधी तर हातात धान्य घेऊन व्हरांड्यात यायची व नाराज होऊन माघारी फिरायची कारण अंगणात चिमण्याच नसतं.

अमेरिकेत वर्षातील ४ महिने तर सुर्य दर्शन घडने कठिणच होते. बर्फ बारी सुरू झाली होती त्यामुळे पक्षी पहायला मिळायचे परंतु आपल्या सभोवताली नेहमीच चिवचिव करणा-या चिमण्या मात्र पहायला मिळणे दुर्मिळच होत. लग्नाचे दोन वर्ष चिमणी सारखे भुर्कुन कधी उडुन गेले कळलेच नाही. 

एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर  विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती.

मी त्या दिवसापासून अंगणात ती चिमणी रोज धान्य वेचुन खायला यावी व मला पहायला मिळावी म्हणून तीला धान्य टाकु लागले. ती एकच चिमणी रोज दिसायची. मी पण.. एक त एक म्हणून धान्य टाकण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. कालांतराने दोन, तीन, चार अशा चिमण्या वाढत गेल्या व मी धान्य टाकतच गेले. आता त्यांची व माझी चांगली ओळख निर्माण झाली होती व त्यांना पण माझा लळा लागला होता. ८ महिन्यांत त्यांची संख्या जवळपास १५ / २० झाली होती. आता त्या माझ्या व मी त्यांच्या चांगलीच परीचयाची झाली होती.  गॅलरीत बसुन हाताच्या अंतरावर त्या धान्य टाकताना बसु लागल्या होत्या. आता मी  अंगणात धान्य टाकण्याऐवजी त्यांना गॅलरीत धान्य टाकत होते व त्या तेथे येऊन खाऊ लागल्या होत्या. माझी धान्य टाकायची वेळ अगदी त्यांच्या परीचयाची झाली होती. मी दरवाज्याची कडी काढायला खोटी की त्या आवाजाने ते तेथे हजर होत असत. आता त्यांनी माझ्या घराच्या शेडच्या आवारातच त्यांनी घरटी केली होती. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. भयंकर पडणा-या बर्फात या कशा राहतील समजत नव्हते. थंडीचा जोर वाढला होता. त्या दिवशी धान्य टाकायला मला थोडा उशीर झाला होता. दरवाजावर  सारखा टक टक आवाज येऊ लागला. दरवाजा का वाजतोय समजायला मार्ग नव्हता. दरवाजा उघडला तर समजले की चिमण्या दरजावर चोची आपटत होत्या व धान्य मागत असल्याचा संकेत देत होत्या कारण बर्फाने सगळा परिसर पांढराशुभ्र होऊन गेला होता व त्यांच्या पोटापाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मी त्यांचा धान्य घालण्याचा नियम कधीच मोडला नाही व  कधी कधी दरजावर मुद्दाम त्यांचा चोचीचा आवाज ऐकण्यासाठी मी उशीर करायची . दोन वर्षांत त्यांची संख्या जवळपास ६०/७० वर पोहचली. खूप आनंद झाला मला हे सर्व पाहून व अनुभवून. आता मी एकटी नव्हते तर आमचं कुटुंब जवळपास ७२ सदस्यांच झाले होते. गेल्या महिन्यात मी अचानक आजारी पडले. मला उठणे बसणे कठीण झाले. पती या कठीण काळात माझी सेवा करायचे. त्यांना खायला घालायचे माझ्या लक्षातच आले नव्हते व ना कधी दरवाजावर टकटक झाली. आजारपणात मला माहित नाही पण कसा काय विसर पडला कळलेच नाही. जवळपास ४ दिवस मी बेडवरून उठू शकले नव्हते. आज ५ व्या दिवशी मी स्वतः उठून बसले व बाथरूममध्ये जाऊन आले. तर लगेच दरवाजावर टकटक सुरू झाली. मला तर हे ऐकून आश्चर्याचाच धक्काच बसला. गेली ४ दिवस यांनी कधीच दरवाजावर टकटक केली नव्हती. कसं बरं समजलं असेल त्यांना की मी आजारी आहे? व आपण दरवाजा वाजवून या आजारी आईला  सतावने उचित नाही म्हणून. आज फक्त घरात उठून बसले तर लगेच दरवाजा ठोठावला. असे कसे घडले असेल? कोणत शास्र यांना आवगत असेल बरं? याच विचारात गेली कित्येक दिवस मी होते. याच उत्तर मला अनेक दिवसांनी मिळाले. आज आपला व्हिडिओ पाहण्यात आला आणि पक्षांना खरोखरच व्हायब्रेशन समजतात याची खात्रीच पटली. मी मला रोखुच शकले नाही तुमच्या त्या व्हिडिओ मधील विधान ऐकुन व लागलीच आपणास फोन केला. 

    पंधरा ते वीस मिनिटे दिपालीजी बोलत होत्या. त्यांचे कानावर पडणारे शब्द अंगावर काटे उभे करत होते. आनंद याच गोष्टीचा वाटत होता की एक चिमणी पासुन ६० ते ७० चिमण्यांचा गोतावळा दिपाली ताईंनी अन्नदाता म्हणून उभा केला होता तो पण परदेशात. ताई तुमचे पक्षांच्या पाठीशी सदैव असेच प्रेम राहो व आपला हा गोतावळा अतिशय मोठा होत राहो व आपल्या हातुन त्यांना सदैव अन्नदान मिळत राहो हीच सदिच्छा.

आज आपण मला चिमणी पक्षांचं आगळवेगळ रुप दर्शन घडवलत़ त्याबद्दल निश्चितच ऋण व्यक्त करतो. आज जागतिक चिमणी दिन या आपल्या सर्व चिमण्या ताईंना जागतिक चिमणी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नक्कीच द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो.

मित्रांनो पक्षांचे जतन आणि संवर्धन हाच पिकांवर परिणाम करणा-या किडींवर नियंत्रण उपाय आहे. त्यामुळे त्यांचे जतन करा व त्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न ठेवत चला. 

लेखक : रमेश खरमाळे, माजी सैनिक 

मो ८३९०००८३७०

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जंगलाला धडकी भरली आहे –  लेखक – श्री शेखर नानजकर ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ जंगलाला धडकी भरली आहे –  लेखक – श्री शेखर नानजकर ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

आता सुट्ट्या लागतील. मुलं आणि त्यांचे पालक, दोघेही मुक्त होतील. प्रत्येकजण शहराच्या या धकाधकीपासून कुठेतरी दूर जाण्याचं ‘प्लॅनिंग’ करू लागेल. कोणी दुसऱ्या शहरात, आपल्या नातेवाईकांकडे जायचं ठरवेल. कोणाला कोकण बघायचं असेल. कुणी ट्रेक ठरवेल. कुणी हिमालयातलं प्लॅनिंग केलेलं असेल. कुणाला सह्याद्रीचं वेड असेल. कुणाला जंगलात जायचं असेल. कुणाला वाघ पाहायचा असेल. कुणी स्वत:ला फोटोग्राफर मानत असेल. कुणाला पक्षी ‘कॅच’ करायचे असतील, कुणाला टायगर ‘ओव्हर’ झाला असेल, म्हणून ‘मायक्रो’ फोटोग्राफीच्या मागे असेल… पण एक नक्की, की एक मोठा लोंढा आता निसर्गात घुसेल.

निसर्गात जाण्याची प्रत्येकाची कारणं थोडीफार वेगळी असू शकतील. पण एक कारण मात्र सामायिक असेल, ‘मज्जा करायची!’ म्हणजे काय करायचं, तर असं काहीतरी करायचं की ज्यानं सगळ्यांना ‘मज्जा’ आली पाहिजे. आणि मज्जा करणारा हिरो ठरला पाहिजे. मग त्यासाठी काहीही वेडे चाळे, आरडाओरडी, विदुषकी चाळे, असं काहीही चालतं. जेणेकरून आपण आकर्षणाच्या केंद्राबिंदूशी असलो पाहिजे. असे सगळे चाळे आणि तमाशे आता पाहायला मिळतील…..

इकडे निसर्गात काय चाललेलं असेल…. थंडीची हुडहुडी कमी झाली असेल. पानगळ जोरात सुरु झाली असेल. काही झाडांना नवीन पालवी फुटू लागली असेल. ओढ्याची धार पूर्ण आटलेली असेल. खाचखळग्यात पाणी साचून पाणवठे तयार झाले असतील. त्या स्वच्छ आणि नितळ पाण्यात निवळ्या फिरू लागल्या असतील. खडकांवर बसून बेडकं जमेल तितकं ऊन खात असतील. नखा एवढे मासे पाण्यात फेर धरू लागले असतील. ‘नावाडी’ किडा पाण्यावर पुढं मागं करत वेळ काढत असेल. पाणतळीच्या दगडांच्या सपाटीतून खेकडे नांग्या बाहेर काढत असतील. मधमाश्या आणि फुलपाखरं पाण्यावर घोंगावू लागली असतील. पाणतळीचं शेवाळ अजूनही हिरवं गारच असेल. मैदानावरची गवतं वाळून गेली असतील. पक्षी आता काटक्या शोधू लागले असतील.

वसंत आताशा सुरू होतोय. अजून झाडांना फुलं लागायची आहेत. काहींना कळ्या धरल्या आहेत. पण पक्षी आत्ता पासूनच घिरट्या घालू लागले आहेत. नर मादी एकमेकांना खुणवू लागले आहेत. आता पळस फुलेल, पांगारा फुलेल, कडूनिंब फुलेल, करवंदाना फुलं लागतील, जांभळाला फुलोरा येईल, बहावा पिवळा जर्द फुलेल. अंजनाच्या जांभळ्या फुलांनी हिरवाई की जांभळाई असा प्रश्न पडेल.

मधमाश्या घोंगावू लागल्या आहेत. कळ्यांची फुलं व्हायची वाट पाहू लागल्या आहेत. त्यांना त्यांची पोळी मधानं भरायची आहेत. अस्वलं त्याचीच वाट पाहत वेळ काढतायत. लिंबोण्या, जांभळं, करवंदं, आंबे… फळांचा नुसता खच पडेल. वानरं सुखावतील, सांबरं, भेकरं, गवे यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. उदमांजरं, जावडीमांजरं, साळींदरं नवीन बीळं उकरू लागतील.

येणार, येणार, वसंत येणार… फळाफुलांनी जंगलं भरून जाणार! पुरेसं पाणी, मुबलक फळंफुलं. आता मिलन, प्रजोपात्ती आणि त्याचं संगोपन! सगळं जंगल आनंदात आहे….!

आणि इतक्यात बातमी आली, दहावी बारावीच्या परीक्षा संपल्या…… येणार येणार पर्यटकांचा लोंढा येणार… जंगलाची शांतता, एकांत, स्वच्छता… काय होणार त्याचं?

सगळ्यात आधी पाणवठे घाबरले! इतर सगळे जीव फक्त गरजेपुरतंच पाणी वापरायचे. फक्त प्यायला! आता माणूस येणार, त्याला खूप पाणी लागतं…. प्यायला पाणी, धुवायला पाणी, शिजवायला पाणी, खेळायला पाणी, नासायला पाणी… तो पाण्यात खेळणार, काहीही बुचकळणार, पाणवठ्यात काहीही फेकणार.. भांडी विसळणार, चुळा भरणार… मग त्या पाण्यातल्या जीवाचं काय? खरं तर या पाण्यावर पहिला हक्क त्यांचा! त्यांनी कुठं जायचं? पाण्यावर येण्याऱ्या पक्ष्यांनी कुठे जायचं? सगळ्या बाजूनं माणसंच राहायला असतील तर जंगलातल्या प्राण्यांनी पाणी कुठं प्यायचं? स्वच्छ, नितळ पाणवठा आता गढूळ होणार, खराब होणारं… त्याला रात्रंदिवस माणसं चिकटणार.. त्याचे नेहेमीचे सवंगडी त्याला भेटू शकणार नाहीत… एखाद्या बंदिवानासारखा पाणवठा आता माणसाच्या कैदेत रहाणार! पाणवठ्याला खूपच वाईट वाटू लागलं….. सुट्ट्या लागल्या… माणसं येणार…. पण तक्रार कुणापाशी करायची?

पायवाटांनाही दाटून आलं.. आत्ता पर्यंत पायवाटांवरून प्राणी जायचे, त्यांच्या खूरांच्या, पंज्यांच्या ठश्यांनी वाट सजायची.. सांबरांची, भेकरांची लेंडकं जागोजाग दिसायची… फळांनी, बियांनी वाटा सजून जायच्या… आता वाटांवर बुटांचे ठसे दिसतील, फळं, बिया, चिरडल्या जातील, प्राण्यांच्या पाउलखुणा पुसल्या जातील, लेंड्या चिरडल्या जातील, मुंगळ्यांची रांग वाटेवरून जात असेल तर ती चिरडून सपाट होईल. वाटेवर आडवी बांधलेली कोळ्यांची जाळी तटातट तुटतील, वाटेवर प्लास्टिक, चांद्या, सिगारेटी, त्यांची पाकीटे, बिसलरीच्या बाटल्या यांचा खच पडेल… जंगलातली जिवंत पायवाट एखाद्या कलेवरासारखी दिसू लागेल. पायवाटांना खूपच वाईट वाटू लागलं……. पण तक्रार कुणापाशी करायची?

झाडंही हेलावली. आत्तापर्यंत त्यांच्या अंगाखांद्यावर वानरं खेळत असायची, शेकरं उड्या मारत असायची, पक्षी उतरायचे, घरटी करायचे, अस्वलं झाडं येंगायची, वाघळं लटकायची, सरडे फिरायचे, मुंगळे रांगा लावायचे… आता माणसं येतील, झाडांवर चढतील, फुलं तोडतील, फळं तोडतील, फांद्या ओरबाडतील, काटक्या तोडतील, त्याच्या शेकोट्या करतील…. झाडांना जे, पक्ष्या – प्राण्यांना द्यायचं होतं ते माणूस खाऊन जाईल… त्याचा विध्वंस करेल…. सुट्ट्या लागल्या, कसं आवरणार या माणसाला? झाडं हिरमुसून गेली.. पण तक्रार कुणापाशी करायची?

दिवसभर पक्षी पाणवठ्याच्या चकरा मारायचे. धोबी यायचे, हळदे यायचे, स्वर्गीय नर्तक यायचे, होले यायचे, सातभाई यायचे, वंचक, सुतार, गरूड, शृंगी घुबडं, खाटिक, खंड्या, बंड्या, कितीतरी पक्षी दिवसरात्र पाण्यावर यायचे. त्यातले काही पाणवठ्यापाशीच राहायचे! आजूबाजूच्या कपारीत, फांद्यांमध्ये त्यांनी घरटी केली होती. काहींनी जोडीदार शोधले होते. दोघं मिळून घरट्यासाठी काड्या काटक्या गोळा करत होते. जंगलाच्या शांततेत आता पर्यंत फक्त त्यांचेच नाजूक स्वर तरंग उठवत होते. वसंताच्या आगमनानं पक्षीगण आनंदला होता, मोहोरला होता. इतक्यात बातमी जंगलात पसरली…. सुट्ट्या लागल्या… माणसांची झुंड निसर्गात घुसणार… अराडाओरडी होणार, जंगलात धूर पसरणार… माणूस पाणवठे काबीज करणार…. त्यात घाण करणार,,, पाणी नासवून टाकणार… आता पाणी कुठे प्यायचं? खंड्यानं कुठल्या पाण्यात बुचकळ्या मारायच्या…. मासे कसे धरायचे? वंचकानं कुठल्या पाणवठ्यात ध्यान लावायचं? पाण्यावरचे किडे धोब्यानं कुठे शोधायचे? दोन महिने तरी आता पाणी माणसाच्या ताब्यात रहाणार! अवघा पक्षीगण चिंतेत बुडाला….. पण तक्रार कुणापाशी करायची? साकडं कुणाला घालायचं?

ओढे आत्ताच आटलेत. आता पाणवठेही कमी कमी व्हायला लागतील. तसंही दिवसभर पाण्यावर जाताच येत नाही. जीवाची भीती असते प्राण्यांना! अंधार पडता पडता पाण्यावर यावं लागतं. रात्रभरात मधून मधून पाण्यावर जाता येतं, पण अंधार असे पर्यंतच! सूर्य बुडाला, थोडं कडूसं पडलं, की आळीपाळीनं प्राणी पाण्यावर जायचे. एकमेकांना टाळून जायचे. दिवसभराचा तहानलेला घसा पाण्यानं ओला करून घ्यायचे. पोट भरून पाणी प्यायचे. पुन्हा पाणी कधी मिळेल सांगता यायचं नाही. पण पाणी पिण्यासाठी पाणवठा त्यांची हक्काची जागा होती. तिथे शांतता होती, समाधान होतं!….. आणि त्यांच्याही कानावर ती बातमी आदळली….. सुट्ट्या लागल्या.. माणसांच्या झुंडी जंगलात घुसणार… पाणवठ्यांच्या बाजूनं मुक्काम करणार… रोज नवनवीन झुंडी….! रात्रभर शेकोट्या करणार, गाणी गाणार, नाचणार, आरडाओरडी करणार, धिंगाणा करणार… निरव शांततेच्या पाठीवर चाकूनं ओढल्यासारखे चरे ओढणार… दिवसभर जंगल तापणार, तहानतहान होणार. दिवसा तर पाण्यावर जाणं शक्यच नसतं, पण आता रात्री सुद्धा पाण्यावर कसं जायचं? तसाच धीर धरून कसाबसा पाण्यापाशी पोहोचलो आणि कुण्या माणसानं पाहिलं तर? आरडाओरडी होणार, लोक त्या प्राण्याच्या मागे पळणार, त्याचे फोटो का काय ते काढण्यासाठी धावपळ होणार… कदाचित काही लोक त्या प्राण्याला मारायलाही सरसावतील. जीव मुठीत धरून त्या प्राण्याला पळावं लागेल… मग तहानलेल्या त्या जीवाचं काय होणार? त्याला पुन्हा पाणी कधी मिळणार?…. नेमके हे उन्हाळ्याचे अवघड दिवस, आणि त्यातून हा जंगलात घुसणारा माणसांचा लोंढा… काय करावं? कुणाला सांगावं? सगळं प्राणी कुळ चिंतेत पडलं…. सुट्ट्या लागल्या… सुट्ट्या लागल्या…!  ओढ्यांचं धाबंच दणाणलं!…. पण तक्रार कुणापाशी करायची?

 जंगलाला धडकी भरली आहे…. आता सुट्ट्या लागल्या आहेत …..!

 लेखक – श्री शेखर नानजकर

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होळी — ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

 

??

☆ होळी — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आज हुताशनी पौर्णिमा आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षातील शेवटचा सण !! सर्वप्रथम सर्वांना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. आजचा सण सर्वसाधारणपणे ‘होळी’ किंवा कोकणांत ‘शिमगा’ या नावाने ओळखला जातो. पण नुसता होळी हा शब्द घेतला तर त्यात अनेक अर्थ लपले आहेत असे दिसून येईल. आपल्या मायबोलमध्ये म्हणी नावाचा एक प्रकार आहे. या म्हणींनी आपली मायबोली अधिक श्रीमंत, समृध्द केली आहे असे आपल्या लक्षात येईल. 

जीवनाची ‘दिवाळी व्हावी, आयुष्यात कायम दसरा असावा, पण आयुष्याचा होळी होऊ नये आणि कोणी आपला ‘शिमगा’ करू नये, असे मानले जाते, तसा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि असायलाही हवा. पण ‘जाणीवपूर्वक’, विशिष्ट आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची होळी करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचेही आजच्या दिवशी कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे नमूद करावेसे वाटते. यात स्वा. सावरकरांचे एक वचन इथे देत आहे. आपल्या संसाराची होळी करून जर उद्या देशाला स्वातंत्र्य मिळणार असेल आणि पुढील अनेक पिढ्या सुखाने जगणार असतील तर माझ्या संसाराची होळी झाली  तरी मला चालेल. सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आदींनी हेच केलं, नाही का ?

आजच्या पावन दिवशी आपल्या अंगीच्या अनेक वाईट गुणांची यादी करून आजच्या होळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर त्या दुर्गुणांची होळी करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न  करू. हे वैयक्तिक पातळीवर करण्यासाठी सुचवले आहे. पण समाज म्हणून विचार करताना, राष्ट्र म्हणून विचार करताना जातीपाती, प्रांतभेद, वर्णभेद आणि तनामनातील अनेक भेद या होळीच्या अग्नीत जाळून भस्मसात करणे तितकेच गरजेचे आहे.

आपल्यातील व्यक्तिगत संकुचित स्वार्थ आणि हेवेदावे विसरुन एकदिलाने *’प्रथम राष्ट्र’ हे ब्रीद वाक्य ध्यानात ठेवून ‘विवेका’ने, योग्य उमेदवारास मतदान करू. आपण सर्वांनी शतप्रतिशत मतदान केले तर  देशाला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार प्राप्त होईल. असा संकल्प करू. आपण सर्व  त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बळकट करू.*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती

शिशिर सरला. वसंतपंचमी ही येऊन गेली. ऋतुबदलाचे संकेत केव्हापासूनचेच. ऊन आता मी म्हणत असलेलं. रात्री तर गारवा अजूनही झोंबणारा. रात्र आली की उदासीनतेची छाया पसरून राहते, मनाच्या कणाकणावर. खिडकीशी येऊन बसलं की थंडावत असलेली रात्र जागी होते. रात्रीला कोलाहल तसा कमीच. रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली की शांतता अवतरते. बराच वेळ टिकणारी. त्या शांततेच्या उदरातही बरंच काही लपलेलं असतं. अभोगी,  अव्यक्त, तेही अंतस्थ, म्हणजे ते तसं असतंच सदानकदा, पण रात्रीने दारावर टकटक केले की ते अकारण असलेलं मनातलं बरंच काहीचं अस्तित्व टोकदारपणे जाणवू लागतं, मग स्वस्थ असणं काही होत नाही. तमाचा खेळ पाहत बसण्यापलिकडे काहीसुद्धा होत नाही,  घडत नाही.  एक दीर्घ श्वास, उच्छ्वास निसासा काही म्हणो….

एकेक पान गळून निष्पर्ण झालेलं झाड समोर खिडकीशीच. एकाद्या व्रतस्थ मुनीसारखं उभं असलेलं. बोलेल काही, आताच. लगेच. वाटत राहतं. सारखं निरखणं त्याला. तसा तो एकाकीच. वाटतं की तो बोलला तर सगळ्या जखमा उघड्या करेल. तसं त्यालाही उचंबळून येत असेलच की. कुणीतरी ऐकणारं लाभावं म्हणून तरसून गेलाही असेल. खोलवरच्या, वरवरच्या जखमांचं दालनच असेल. मूळापासून ते टोकापर्यंत. तडतडणाऱ्या साली, भेगाळलेला बुंधा. हिरवं काही नसण्याची निराशा आणि झुंज गारठ्याशी. पाऊसकाळ अजून तसा लांबच, भिजवून टाकायला. जमीन तशी कोरडीच.  हात आकाशाला टेकायचे म्हणून वर वर वाढणं तेव्हढं झालेलं, पण हेमंत व शिशिराने सारे वैभव लुटून नेलेलं. एक साधं इटुकलं पानही राहू दिलं नव्हतं फांद्यांवर. कोण काळाचे वैर उभं राहिलेलं. तग धरणं तेव्हढं हातात. गारठ्याबरोबर असतो वारा तोही अचूक सूड उगवतो. 

कधीकधी उत्तर, मध्य वा पूर्वरात्रीच चंद्र उगवतो, तो काही सूड उगवत नाही. उलट त्याचं असणं हे आश्वासक थोडंफार. तसा तो लांबच, पण शुभ्रधवल किरणांची पखरण करून बापजन्माचा दाह शमवण्याचा त्याचा प्रयत्न, तोही कधीकधी केविलवाणा भासणाराच. तोही किती पुरणार? जेथे शीतलतेचीही धग वाटावी ही परिस्थिती. किती काढावी कळ? किती सोसावं? 

नेहेमी निळंशार असणारं आभाळही राखूडलेलं. एकदा का दिवाकर मावळला की आभाळ रंग बदलतंच.कितीही असोत टिमटिमणारे तारे, ते अनंत असलेलं आभाळ गूढ वाटू लागतं. तेही अनंत. तसं असलं तरी जितकी भूमी हवीशी तितकंच आभाळही. ते परकं नसतंच कधी. दिवसभराची दगदग संपली की एकांतात तेच साथीला. बस न्याहाळत रहावं त्याला. निरूद्देश. काहीच बोलू नये, काही सांगू नये. फक्त एकमेकांपुरतं असण्याचंच नातं! बस तेव्हढंच पुरे!! 

पर्णहीन असलेल्या खोडावर एखादा निशाचर येऊन बसतो सावकाश. विसावा घेऊन झालं की देतो कर्णकर्कश हाळी व पंख फैलावत उडून जातो. काहीक्षण वाटत असतं आहे कुणीतरी सोबतीला, पण ते काहीक्षणच. हवी असते तशी साथ, यावं कुणीतरी, गुजगोष्टी कराव्यात, ख्यालीखुशाली विचारावी, मनमोकळं करावं, रितं व्हावं. आपलंसं होऊन जावं, पण ते तितकसं सोपं नसतं. मोकळं होता येतच नाही. आभासी क्षणिक जवळीक तशी आभासीच. निष्पर्ण वृक्षावर घरटं कधी करतात का पाखरं?

दिवस चटकन निघून जातो. रात्र सरतासरत नाही. ती सरपटत असते हळुहळू गोगलगायीसारखी. दूरसुदूर तमाचं साम्राज्य. दिवा लावो वा निओनसाइन्स. तमाचं राज्य अढळच, एकछत्री. क्षणाक्षणावर अंमल त्याचा. हटता हटत नाही तो काळोख, आत आत झिरपत जात असलेला, जन्मोजन्मीचं नातं असल्यागत. तो काळोखही आवडायला लागतो कधी ते कळतही नाही. मग रात्र होण्याची वाट पहायची सवयच लागते. काळोखाला घट्ट मिठी मारण्यासाठी. काळोखाला नसतात दिशा, काळोखाला नसतात मार्ग. काळोखाला नसतो तळ वा नसते गती. काळोख बऱ्याचदा असतो गोठून जाणारा क्षण. तोही कल्पेच्या कल्पे वाटावा असा. त्या गोठलेल्या काळोखाचं सौंदर्य शिल्पीत करावं अशी एक शलाका क्षणभर चमकून जाणारी. तीही निखळणाऱ्या ताऱ्यागत, उल्कागत. तरीही  तम, काळोख आपला वाटावा तो क्षण मोलाचा! 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

(आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.) – इथून पुढे 

पूर्वी प्रत्येक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागे तिथे आता तसे करण्याची गरज उरली नाही. बँकेत कॉम्पुटर आले तशी जॉब जातील अशी ओरड करणाऱ्या युनियन्सचे देखील या ऑटोमेशनच्या रेट्यापुढे काहीही चालले नाही. देशाचे बजेट काही हजार कोटींचे असे ते काही लाखो कोटींचे झाले. ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नसल्याने ब्रांच मधील स्टाफ कमी झाला असला तरी बँकांची आणि ब्रांचेसची संख्या वाढल्याने बँक क्षेत्रात बेकारी वाढली नाही. पैसा खेळू लागला त्यामुळे बँकेचा स्टाफ जो कांऊटर बसून व्यवहार करत होता तो कार लोन, होम लोन,बिझनेस लोन देण्यसाठी मार्केटिंग करत फिरू लागला. ऑटोमेशनमुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याची गरज संपली तशी कॅश व्यवहार करण्याची गरज देखील संपली. अगदी १० रुपयांची वस्तू घेण्यास पैसे जवळ बाळगण्याची गरज देखील संपली. QR कोड नावाची जादुई गोष्ट प्रत्येक दुकानात फेरीवाल्याकडे आली. आर्थिक देवाणघेवाण गरिबच काय अशिक्षित देखील सहज करून लागला. सुट्या पैशांचा प्रश्न तर सुटलाच. पण उरलेले किती द्यायचे घ्यायचे ही वजाबाकी (होय काही सुशिक्षित तरुणांना देखील ही वजाबाकी अवघड जात असे)  करण्याचा प्रश्न पण संपला. बँकेत एके काळी राजकीय पक्षांच्या लोन वाटपाच्या योजनांसाठी लागणारी झुंड बंद झाली आणि सामान्य व्यावसायिक आत्मनिर्भर होऊ लागला. त्याचा क्रेडीट स्कोर तयार होऊ लागला. लोन देण्यसाठी बँक पुढे येऊ लागली कारण लोन बुडणार नाही याची खात्री बँकेला झाली.

इतके दिवस ऑटोमेशन मानवी कष्ट कमी होतील किंवा कमीत कमी मानवी कष्टात जास्तीत जास्त उत्पादकता मिळावी या साठी होती. उत्पादकतेबरोबरच गुणवत्ता आणि अचूकता हा देखील उद्देश होता. आता हे ऑटोमेशन मानवी क्षमताच्या आणि भावभावनांच्या ताबा घेऊ लागले आहे किंवा त्यावर मात करू लागले आहे. उदा. गाडी चालवणे ही केवळ मानवी क्षमता असे आजवर आपण मानत आलो आहोत. कारण गाडी चालवताना कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियांकडून जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचे मेंदूंत अतिशय वेगाने पृथक्करण करून ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे,आपत्कालात प्रसंगी क्षणात ब्रेक दाबणे, जरुरी इतके डावीकडे वा उजवीकडे वळणे इत्यादी क्रिया आपला मेंदू इतर अवयावांकडून सहजतेने घडवून आणतो. एकदा गाडी चालवण्याचे तंत्र शिकले की गाडी केव्हाही हातात घ्या आपला मेंदू आणि इतर अवयव एकमेकांशी संवाद साधून आपण अपघातरहित गाडी चालवतो. हे केवळ मानवाला दिलेले ईश्वरी वरदान आहे असा आपला आजवरचा समज. अर्थात गाडी चालवताना मेंदू आणि अवयव यांच्यातील संवाद काही कारणाने वा लक्ष विचलित झाल्याने तुटला तर अपघात हमखास. हे लक्ष विचलित होणे ही चूक मानवाच्या हातून होणे ही सहज प्रवृत्ती आहे. पण ही चूक प्राणांतिक ठरू शकते. ए-आय या मानवी चुकांपलीकडे काम करण्याची क्षमता ठेवते. यात कारला चहू बाजूने कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेर्यांनी घेतलेल्या फोटो एका कृत्रिम मेंदूकडे पाठवले जातात हा मेंदू (CPU) या इमेजेसचे तत्काळ पृथक्करण करून गाडीत असलेल्या वेगवेगळ्या मोटोर्सना (अवयव) आज्ञा देऊन काय action घ्यायची हे घडवून आणतो. हे काम मानवी मेंदू आणि त्यांचे अवयव ज्या तत्परतेने करतात त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक घडू शकते. आता ड्रायव्हरची गरजच नाही. ए-आयला मानवी भावभावना नसल्याने चित्त विचलित होण्याचा प्रश्नच नाही. शिकवलेले काम मुकाट्याने करायचे. रस्त्यात सुंदर मुलगी दिसली म्हणून चित्त विचलित झाले. घरी बायकोशी भांडण झाले म्हणून आज गाडी अवास्तव वेगात नेली आणि धडकवली हा प्रश्नच नाही. आता भावभावनांच्या कल्लोळातून अपघात होण्याचा प्रश्न टळला. कोणत्याही नव्या डेव्हलपमेंटनवे प्रश्न उपस्थित नको का व्हायला? मग अशा ए-आय चलित गाड्या आल्या तर ज्या लाखो ड्रायव्हरांना नोकऱ्या मिळतात त्यांच्या बेकारीचे काय. ग्राहकाला नाकारणे, अवास्तव पैसे मागणे, उर्मटपणे बोलणे हे दुर्गुण घेऊन जर ड्रायव्हर ग्राहकाशी वागणार असतील तर उद्या OLA UBER अशा गाड्या घेऊन रस्त्यावर आल्या तर काय हा प्रश्न आहे. अशा गाड्या महाग आहेत आणि फक्त अतिश्रीमंतांना त्या परवडतील त्यामुळे काळजी नाही असा जर आपला समज असेल तर तो खोटा आहे. आज गाडीच्या भोवती लावलेले कॅमेरे गाडी चालवताना चालकाला अपघाताची क्षमता असलेल्या जागेची सूचना देऊ लागल्या आहेत. अगदी ५० फुटावर असलेला स्पीड ब्रेकर गाडीला ओळखता येतो. किंवा रस्त्यावरचे खड्डे ओळखून गाडीतील लोकांना त्रास होणार नाही नाही या नुसार गाडीचा वेग कमी होऊ शकतो अशी वाहने बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. तेव्हा ए-आय आधारित स्वस्त कार्स फार दूर नाहीत. वर कारचे उदाहरण दिले आहे. अशा अनेक जागा ए-आय माणसाकडून हिसकावून घेते आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये वेटर्सची जागा ए-आय रोबोट्सनी घेतली आहे. डिलिव्हरीबॉय डिलिव्हरीड्रोन घेतायत. जगातले अनेक संशोधक नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या कामात आपली creativity दाखवत आहेत. ए-आय हे केवळ शाप की वरदान हा निबंध लिहिण्याइतकेच मर्यादित नाही तर त्यापलीकडे मानवी जीवनावर परिणाम साधणारे आहे. यात केवळ ड्रायव्हर, डिलिव्हरीबॉय आणि वेटर्सचे जॉब जाणार नाहीत तर चित्रकार, कलाकार, व्हाईस artist, actors, क्लार्क, शिक्षक, मॅनेजरस् अशा अनेकांना आपले स्कील वा ज्ञान ए-आयच्या पलीकडे अद्ययावत ठेवावे लागणार आहे. हा तंत्रज्ञानाचा रेटा कोणीच रोकु शकणार नाही. रेल्वेत, मेट्रोमध्ये बुकिंग क्लार्क आता लागतच नाहीत. तंत्रज्ञानामुळे मेट्रोमध्ये विदाऊट तिकीट तुम्ही जाऊच शकत नाही. रस्त्यावर ट्राफिक नियमांचे केलेलं उल्लंघन तुमच्या मोबाईलवर त्याचे चलन येते कारण कॅमेरे तुम्हाला गुन्हा करताना ओळखतात. ‘उपरवाला सब देख रहा है’ ही उक्ती आता प्रत्यक्षात आली आहे ती ए-आयमुळे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना तपासणीमधून जावे लागत नाही ए-आय कॅमेरे तुम्हाची ओळख पटवून घेतात नी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतात. कारण तुमची ओळख ए-आय कॅमेरे ज्या अचूकतेने घेतो ती मानवाच्या दृष्टीतून कधीतरी सुटू शकते.  बेकायदेशीर मानवी तस्करी,गुन्हेगारांचा शोध ए-आय सहज घेऊ शकते. पोलिसांना ए-आय वरदान ठरणार आहे. उद्या ए-आय स्वयंपाकघरात येणार आहे. गृहिणीचा वा गृहस्थाचा सुगरणपणा ए-आय माध्यमातून काय स्वयंपाक करायचा आणि चव कोणती आणायची हा असणार आहे.

ए-आय हा मानवाचा मदतनीस असणार त्यापेक्षा जास्त स्पर्धक असणार हे निश्चित. इतकी वर्षे ऑटोमेशन मशीनपुरते मर्यादित होते. आता एआयमुळे ते मानवापर्यंत येऊन ठेपले आहे.  या स्पर्धाकाशी मुकाबला सोपा नाही. गेली २५ वर्षे softwareक्षेत्राने मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्ग अथवा श्रीमंतीचे दिवस आणले. त्यांचा गर्व देखील हे एआय उतरवणार आहे. Software coding आता एआय करू लागले आहे. एके काळी मॅट्रीक पास होण्याच्या जोरावर नोकरी मिळवणे आणि ती रिटायर होईपर्यंत टिकवणे शक्य होई. आता ही मंडळी आता भाग्यवान वाटू लागली आहेत. छोट्याश्या ज्ञानाच्या भांडवलावर संसार ४-४ मुलाबाळांची लग्ने केली. आता आपले आज कमावलेले ज्ञान उद्या निकामी आणि निरुपयोगी ठरणार आहे. ज्ञानाची कुशलतेची expiry date पाच वर्षांच्या आत येते आहे. कशी टक्कर देणार याला हा मोठा प्रश्न आहे.  आपली विनयशीलता,कार्यक्षमता, बुद्धिमत्ता, चातुर्य  या गुणांवर काही प्रमाणात टक्कर देणे शक्य आहे. मत्सर, इर्षा,भांडखोरवृत्ती, उर्मटपणा सोडला आणि एकमेकांना धरून या स्पर्धेवर मात करावी लागेल. नाहीतर बायको/नवऱ्याचा  प्रेयसी/प्रियकराचा स्वभाव फार किरकिरा आहे म्हणून कोणी एआय ड्रिव्हन अलेक्सा अथवा जॉन बरोबर रहाणे पसंत करू लागले तर ही स्पर्धा कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. काळजी घेऊयात. नाहीतर…..पस्ताओगे.

असो. ऑटोमेशनविषयी सध्या इतकेच.

– समाप्त – 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

? इंद्रधनुष्य ?

☆ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ☆ श्री हेमंत तांबे 

भगवान कृष्णाने छोट्या करंगळीनंच गोवर्धन पर्वत का उचलला ?

तसंही आपण सर्व जाणतोच की, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णानं करंगळीनं गोवर्धन उचलला.

दुसऱ्या बाजूने सुध्दा या प्रसंगाचा विचार करता येईल.

जेव्हा कृष्णानं इंद्राच्या रागा पासून गोकुळ वासियांचं संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपल्या बोटानं उचलण्याचं ठरवलं, तेव्हा कृष्ण आपल्या हाताच्या बोटांना विचारतो, मी कोणत्या बोटानं पर्वत उचलू ?

सर्वात आधी अंगठा म्हणाला, मी सर्वात ताकदवान आहे, पुरुष आहे, बाकीच्या तर स्त्रिया आहेत, आपण पर्वत उचलण्यासाठी माझाच वापर करावा !

नंतर तर्जनी म्हणते, भगवान, कधी कुणाला चुप बस असं सांगताना मिच कामास येते.आणि आपण जे काम करणार आहात ते इंद्राला चुप करण्याचंच आहे.म्हणून आपण माझा वापर करावा, हे उत्तम !

यानंतर मध्यमा म्हणाली, सर्वात उंच होण्यासोबतच मी ताकदवान सुध्दा आहे.म्हणून या कामासाठी आपण माझाच विचार करावा !

अनामिकेला खात्री होतीच, तरीही ती म्हणाली, भगवान, सर्व पवित्र कामं माझ्यामुळं संपन्न होतात. सर्व मंदिरांत मीच देवतांना टिळा लावते.

आता कृष्णानं फक्त छोट्या करंगळीकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी होतं, ती म्हणाली, ” भगवान, एक तर मी सगळ्यात छोटी आहे.माझ्यात असा कोणताच असामान्य गुण नाही.

माझा कुठं उपयोग सुध्दा होत नाही. माझ्याकडे एवढी शक्ती सुध्दा नाही, की मी पर्वत उचलू शकते. मला फक्त याची खात्री आहे की, मी तुझी आहे !” छोट्या करंगळीचं म्हणणं ऐकून भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, “ कनिष्ठे तुझी विनम्रता पाहून मी आनंदी झालो आहे. जर काही उच्च मिळवायचं असेल तर विनम्र होणं आवश्यक आहे.” ….. आणि कनिष्ठेच्या सन्मानासाठी भगवंतानं करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला !”

कृष्णं वंदे जगद्गुरुम् 

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आजी उदास आहे हे आजोबांच्या लक्षात आलं.

“काय झालं गं ?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाली, “अहो, आता थकवा येतो. आधी सारखं राहिलं नाही. आता गडबड गोंगाट सहन होत नाही. कुठे जायचं म्हटलं तर जास्त चालवत नाही. कधी भाजीत मीठ टाकायला विसरते, तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलंय माहीत नाही!”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही. आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळही करू शकत नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात जे काही आहे, त्याचा विचार करावा.अग, वयानुसार हे सर्व होणारच.आधीचे दिवस आठव ना. किती कामं करायचीस तू. पूर्ण घर तू खूप छान सांभाळलंस.मला कशाचीच काळजी नव्हती कधी.आता वयोमानानुसार हे सारं होणारच. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणं आपल्या हातात आहे.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर थोडे शारीरिक बदल होतातच. थोडे आपल्यालाही करायचे असतात. आपली आयुष्याची घडी परिस्थितीनुसार बदलायची असते. चल. आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण. तू छान ती नारंगी साडी नेस. रात्री आपण बाहेरच जेवू.”

आजोबा संध्याकाळी आजीला घेऊन बाहेर पडले व जवळच असलेल्या बसस्टाॕपवर जाऊन बसले.दोघे बराच वेळ तेथेच भूतकाळात रमत गप्पा मारत बसले. आजोबा म्हणाले, “अगं, पाय दुखत असतील तर मांडी घालून बस छानपैकी.नंतर पाणीपुरी शेवपुरी खाऊनच घरी जाऊ.” अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे दोघांचे फिरणे झाले.

आजीची उदासी मात्र कुठे पळाली, हे तिला कळलंच नाही. ती अगदी ताजीतवानी झाली.

 मोबाईल पकडून आजीचा खांदा दुखतो, म्हणून आजोबांनी आजीसाठी मोबाईल स्टॅन्ड मागवला.आज आजीने आजोबांना सकाळीच सांगून टाकलं की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला घेऊन या.आजोबांनी आनंदाने आणलेले समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या पाहुन आजी म्हणाली,”अहो.. एवढं का आणलंत?” आजोबा म्हणाले,”अगं, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आजी आजोबांची पार्टी छान  झाली.

आजोबा बऱ्याच वेळा पासून एका बाटलीचं झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून नातू म्हणाला,” द्या आजोबा मी उघडून देतो.” आजोबा म्हणाले, “अरे, नको, बाळा.मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच रे. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचं हे मी ठरवलंय. रोज फिरायला जाणं, भाजी आणणं , भाजी चिरणं , साफसफाई करणं , धुतलेले कपडे वाळत घालणं , वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं अशा कामांची जबाबदारी मी घेतली आहे.तुझ्या आजीला मदतपण होते आणि माझा वेळही जातो.”

वाहतं पाणी ‘धारा’ म्हणजे पुढे पुढे वाहत जाणारी उर्जा. तेच साचलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. आयुष्याचं पण असंच आहे. शक्य तेवढं सक्रिय राहणं ही आवश्यकता असते. जे जमेल, जसं जमेल, जे आवडेल, जे झेपेल ते करत रहाणं गरजेचं आहे. चलतीका नामही जिंदगी है! वयाच्या ह्या वळणावर

एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने,विश्वासाने हातात घेणं ही उर्वरित आयुष्याची गरज आहे.

म्हणूनच  

प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्या तीन चार दिवस झालेय विदर्भातील हवामान एकदम बदललयं.दिवसभर ऊनं असतं आणि अचानक संध्याकाळ झाली की जणू पूर्ण आभाळ घेरुन येतयं.अंधार पसरतो.सगळीकडे मळभ दाटल्यागतं उदास वाटू लागतं.मार्च एंडिंगच्या कामामुळे तसही संध्याकाळी सहा वाजतातच बँकेतून निघायला.

अशाच कालच्या संध्याकाळी स्कुटरवरुन परत येत असतांना अंधारुन आलं, सगळीकडे गच्च झालेल्या आभाळानं उदासलेलं वाटू लागलं. गार वारं वाहू लागलं. हवामान आणि वातावरणात सुध्दा एक प्रकारची नैराश्येची चादर पसरल्यागतं वाटतं होतं.

तेवढ्यात पावसाच्या पाण्याचे अलगद टपटप दोन तीन थेंब अंगावर पडले आणि काय सांगू ह्या अगदी इटुकल्या पिटुकल्या दोनचार पाण्याच्या थेबांनी वातावरणातील एकदम नूरच पालटला. गाडीने मस्त आपोआप स्पिड घेतला. हिंदी गाणे आठवायला लागले. आतापर्यंत गाडी चालवणे कंटाळवाणं वाटतं होतं ते अचानकच हवहवसं वाटू लागलं.अगदी “ए हँसी वादियाँ, ये खुला आसमाँ” गत फील आला बघा. ह्या पाण्याच्या दोनचार थेंबांनी अगदी जादूच करुन टाकली.आणि त्या क्षणी पाण्याला “जीवन” ह्या अर्थपूर्ण शब्दानी का संबोधतात हे परत एकदा नव्याने कळलं.

22 मार्च .”जागतिक जलदिन”

संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युएनओ च्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 साली “फर्स्ट वर्ल्ड वाँटर डे” घोषित केला.ह्याचं सगळं श्रेय डॉ. माधवराव चितळे ह्यांना जातं. त्यामुळेच 2015 साली जलदिनाच्या रौप्य महोत्सवाच्या निमीत्ताने त्यांना “स्टाँक होम” ह्या जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

मी एक शेतकरी पण असल्याकारणाने माझ्यालेखी खरोखरच पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.कारण शेतीचा श्रीगणेशा करतांना आधी ह्या पाण्याशिवाय,जीवनाशिवाय एक पाऊलही पुढे  टाकता येत नाही. आधी पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि मगच ह्या पाण्याचे स्त्रोत तयार होऊन शेतीला,पिण्यासाठी ह्याचा उपयोग होईल.

दुर्दैवाची गोष्ट तर अशी आहे की दिवसेंदिवस जंगल आणि रिकाम्या जमीनी कमीकमी होतात आहे आणि त्याची जागा अजस्त्र इमारती, सिमेंटची जंगल ह्यांनी घेतलीयं. लोकांना व सरकारला पाण्याचा व शेतात पिकणाऱ्या पिकापेक्षा निवा-याचा,घरांचा प्रश्न खूप मोठा वाटतोय. माझ्या बघण्यात असे कितीतरी लोकं आहेत की ज्यांच्याकडे राहत्या घराशिवाय दोन चार घरं,फ्लँट गुंतवणूक म्हणून रिकामी घेऊन पडलीय.मध्यंतरी एक छान आर्टीकल वाचायला मिळालं होतं. त्यात लिहीलं होतं राहण्यासाठी प्रत्येकाला एक घरच फक्त घेता येईल बाकी सगळी जमीन जंगलं, शेती, वेगवेगळी पिके ह्यासाठी वहिवाटीत आणता आली तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित.

अर्थात हे कोण्या एकट्याचे काम नव्हे. हे सरकार आणि त्यांना बरोबरीने साथ देणारी जनता असेल तरच हे शक्य आहे.कुठल्याही सरकारच्या आणि जनतेतील प्रत्येकाच्या मनात स्वार्थ, बुभूक्षिता सारखी हावरी वृत्ती ह्याबद्दल चीड निर्माण होऊन फक्त आणि फक्त देशप्रेमाची ज्योत मनात तेवत राहील तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे सध्याची सगळी अवतीभवती ची परिस्थिती बघता आपण ह्या चांगल्या दिवसांचा,चांगल्या वृत्तीचा विचारही करु शकत नाही.

पाण्याचा स्त्रोत प्रदुषित न करणे,योग्य व आवश्यक तितकाच पाण्याचा वापर ह्या किमान गोष्टी तरी प्रत्येकाने पाळल्या तरच ठीक अन्यथा पाणी पाणी करीत सगळा -हास होण्याचा दिवस काही दूर नाही.

सरकारने चांगल्याचांगल्या योजनांसाठी प्रामाणिकपणे फंड उपलब्ध करून द्यावा, अधिकारी वर्गांनी प्रामाणिकपणे पणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्या फंडाचा त्याच लोकोपयोगी कामासाठी विनीयोग करावा व जनता जनार्दनाने त्या दिलेल्या गोष्टींना जागून आपल्या देशाचा विकास व उन्नती कशी होईल ह्याकडे लक्ष पुरवावं. अशी त्रिमूर्ती ची एकजुट आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करेल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती

घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे.  किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे.  शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं.  तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात. 

सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं  माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं.  काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून  व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो. 

दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!!  पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.  

मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह.  चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं.  काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी. 

(२०/०३/२०२३ – # जागतिक चिमणी दिवस)  

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print