(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “नाम रिश्तों के जो देते थे खुशी हर एक को…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ ‘चारुचन्द्रिका’ से – गजल – “नाम रिश्तों के जो देते थे खुशी हर एक को…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
आय.टी. क्षेत्रात काम करणारे सुशांत प्रज्ञा आपापल्या कंपनीत अतिशय चांगले काम करत होते. लग्न करून शहरात नोकरी निमित्ताने स्थिर होऊ पहात होते.
दोघांचाही पगार लाखांच्या पलिकडचा त्यामुळे सगळ्या ऍम्यूनिटिज असलेल्या महागड्या टाऊनशिपमधे त्यांचे सर्व सोयींनी युक्त असे टू बीएचके चे घर.
सकाळी उठून दोघेही आपापल्या कारनी ऑफिसला जायचे. संध्याकाळी यायची वेळ निश्चित नाही पण यायचे आणि तरी समोर लॅपटॉप उघडून बसायचे आणि मोबाइलवर सतत कॉल्स.
एकमेकांशी बोलायला वेळ नाही आणि धडपणे जेवायला जमत नाही. अशी गत•••. स्वयंपाक करायचा कोणी? बाईने केला तरी तो थंड स्वयंपाक खायचा कोणी? नकोच असले काही म्हणून दोघांनीही रोज आपल्या आवडीचे जेवण बाहेरून मागवायचे, जमलेच तर एकत्र जेवायचे नाहीतर ज्याला जसे जमेल तसे त्याने खाऊन घ्यायचे.
एकमेकांबरोबर कुठे जाणे सोडाच, पण एकमेकांशी धडपणे बोलताही येत नव्हते त्यांना. पाच दिवस काम दोन दिवस सुट्टी, असे असले तरी सुट्टीच्या दिवशीही एकतर बरेच उशीरा उठायचे आणि मग ५ दिवसांचे कामाचे प्लॅनिंग, काही क्लायंटसच्या शंका कुशंका सोडवणे आणि इतर काही गोष्टींमुळे दोघे आपल्यातच व्यग्र.
कामापुरते जुजबी गोष्टीच ते एकमेकांशी बोलायचे. घर आणि रहाणीमान पाहून सगळ्यांना वाटायचे ‘ वा काय मस्त संसार चालला आहे राजा राणीचा ••’ त्यांच्या आपसातील प्रेमाचा(?) हेवाच वाटायचा प्रत्येकाला.
१-२ महिन्यांनी गावाकडून बोलावणे यायचे. मग दोघांनी आनंदाने प्रेमाने जावे की नाही? पण नाहीच, त्यावरूनही कधी सुशांत तर कधी प्रज्ञा चिडायची. अरे आपल्याला आपली काही स्पेस हवी की नाही? एरवी नोकरी, क्लायंटस आणि सुट्टीच्या दिवशी काय तर म्हणे आई-बाबा आजी यांना भेटायला जाऊन दमायचे. कधी मिळणार आपल्याला आपल्यासाठी स्पेस?
झाऽऽऽले या दोघांमधे कोणी नको म्हणून गावाकडच्यांनी यांना शहरात रहायला परवानगी दिली, अभिमानाने कौतुकाने यांच्याबद्दल गावातल्या सगळ्यांना सांगत होते. मग हे दोघेच एकत्र रहात होते तरी त्या दोघांनाही मनाप्रमाणे एकमेकांना वेळ देता येत नव्हता, तसेच स्वत:साठीही वेळ देता येत नव्हता, तेवढी स्पेस त्या दोघांना मिळत नव्हती ही फॅक्ट होती•••
एका विकेंडला असेच गावाकडे जाण्यावरून दोघांचेही बिनसले. प्रज्ञा म्हणाली, “ यावेळी मी नाही येत, तूच एकटा जा.” तर सुशांत म्हणाला, “ तुझ्या आई बाबांकडे मी येतो ना? मग माझ्या आई बाबांकडे जाताना तुला का प्रॉब्लेम येतो?” ती म्हणाली, “ मी पण येतेच की, पण आज मला शांतता हवी आहे. मला माझी स्पेस हवी आहे. थोडी विश्रांती हवी आहे. तर तू मला माझी स्पेस देणारच नाहियेस का? ”
असे बोलून ती एका बेडरूममधे जाऊन दार लावून बसली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. डोके ओढणीने बांधून घेतले. पडदे ओढून अंधार करून ती पलंगावर पडली. हळूहळू तिला थोडे शांत वाटायला लागले, आणि तिला तिची आई आजी दिसू लागले•••
आई बाबा काका काकू आजी, आम्ही दोघे भावंडे आणि चुलत दोन भावंडे, असे ९ जण एका कुटुंबात रहात होतो. आई घरातील मोठी सून म्हणून सगळी जबाबदारी तिच्याकडे होती. पण सगळ्यांच्या आवडी निवडी, आजीचे मत, सगळे सांभाळून ती आनंदाने रहात होती. वडिलांच्या कामात हातभार लावून मधेअधे सिनेमा नाटके फिरायला जाणे हे सगळे ती करू शकत होती.
मग प्रज्ञाला आठवले … एकदा तिने आईला याविषयी विचारलेही होते, “ तू कसे हे सांभाळू शकतेस? कसं जमतं गं तुला? “ तेव्हा आई म्हणाली होती, “अगं हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच करते ना? मग आपल्या माणसांसाठी काही केले तर ते कष्ट जाणवत नाहीत. ते कष्टच वाटत नाहीत. फक्त त्यासाठी थोडी तडजोड आवश्यक आहे.”
“अजून एक सांगते बघ••• मला जेव्हा त्रास व्हायला लागतो ना? तेव्हा मी सासूबाईंचा विचार करते. अगं आपलं तर तेव्हा २०-२५ जणांचं कुटुंब होतं. तरी त्यांनी नाही सगळं सांभाळलं? त्यांना पती पत्नींना एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडाच पण एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. मग एकमेकांशी बोलणे नाही जमले तरी कोणाच्याही नकळत एकमेकांना स्पर्श करणं. काही खोड्या करणं यातूनच तर प्रेम बहरलं. एकमेकांच्या हृदयात घर केलं. ( हृदयात स्पेस निर्माण केली) सगळं घर हसतं खेळतं ठेवलं.”
“मग त्यांच्याही सासर्यांचे निधन झाले म्हणून घराच्या वाटण्या झाल्या आणि त्यांच्या ४ मुलांसवे वेगळ्या राहू लागल्या. तरी सणवार,लग्न, मुंज आदि सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी इतरांच्या मनातही असलेली स्पेस जपलीच ना? तेव्हा घरात जागा नसेल कदाचित पण प्रत्येकाच्या मनात निश्चित जागा होती. हे सगळे पाहिले आणि मग थोडा त्याग, थोडी आपल्या भावनांना मुरड घालता आली तर आपणच आपली स्पेस निर्माण करू शकतो हे पटलं. म्हणून मी पण सासूबाईंच्या नकळत त्यांचा हा गुण चोरला म्हटलीस तरी हरकत नाही.”
प्रज्ञाला हे आठवले मात्र. तिने डोळे खाडकन उघडले . तिच्या मनात असंख्य विचार भिरभिरून गेले. आपण दोघेच रहात असलो, घर मोठं असलं तरी आपल्याला स्पेस नाही हा किती कोता विचार आहे हे लक्षात आले. आपल्याला स्पेस मिळण्यासाठी कुणाच्यातरी मनात स्पेस निर्माण करता यायला हवी हे तिला पटले.
तेव्हा स्पेस नसेलही कदाचित, पण एकमेकांच्या मनातील स्पेसमुळेच सगळी सुख दु:खे संकटे यांना सामोरे जायचे धैर्य मिळत होते, खंबीरता लाभत होती. आता एवढी स्पेस असूनही एकमेकांच्या मनातच स्पेस नाही त्यामुळे संकटकाळी अडीअडचणींना एकट्यानेच सामोरे जावे लागते आहे. तेवढे धैर्य आपल्यात नसले तरी वरवर ते आपण दाखवतो आणि आतल्या आत खचतो.
ही खच कोणाच्याही हृदयात स्पेस नसल्याने कोणालाच कळत नाही. आता आपणही अशीच स्पेस निर्माण करायला हवी हे तिने आता भांडून घेतलेल्या स्पेसने तिला शिकवले होते.
प्रज्ञा बाहेर आली आणि सुशांतला म्हणाली,” चल आपण गावाकडे जाऊ.” गावाकडील लोकांच्या मनात स्पेस करण्याच्या या विचाराने सुशांतच्या हृदयातील तिची स्पेस जरा बळकट झाली होती.
☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण –…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !
आज त्यांची पुण्यतिथी
त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.
आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात.
पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.
आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच.
परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’ खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?
या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’
असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….
म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी
“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
हिरवं पान
कधीतरी पिकणारच,
पिकलं पान
कधीतरी गळणारच,
गळलं पान
मातीला हे मिळणारच.
झाड कधी कण्हतं का?
कधी काही म्हणतं का?
गिरक्या गिरक्या घेत घेत
नाचत जातं पिकलं पान,
कविता पिवळी पिवळी धमक
वाचत जातं पिकलं पान!
नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप
बोरकर एकदा म्हणाले
सिगारेटचा सोडीत धूर
“सत्तर संपली तरी माझ्या
गळ्यात तरुणताजा सूर!
तीन मजले चढून आलो
असा दम अजून श्वासात
– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”
कवितांतून
रंग रंग झरू लागले
प्रत्येक क्षण
आनंदाने भरू लागले!
घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,
धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!
पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस
पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत
उभा होता किती वेळ,
रंगून जाऊन बघत होता
बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!
रस्त्यावरच उभं राहून दोघांनी
मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!
मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,
जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!
खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण!
आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?
नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?
अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?
थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?
तुम्ही काय घ्यायचं
ते तुम्ही ठरवा,
तुम्ही काय प्यायचं
ते तुम्ही ठरवा!
त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:
वय तुमचं साठ असो, सत्तर असो,
तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;
मोरासारखा अंधार फुलून आल्यावर
मजा आणते थोडीशी काजूफेणी!
तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,
रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता रसिकार्पण.
आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे.
दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.
हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात.
आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.
विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं….. पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो.
कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.
त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते.
निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…
या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!!
तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल.
☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला.) इथून पुढे —
1939 ते 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले. या काळात फळणीची योजना मागे पडली. दुसऱ्या महायुद्धात युरोपातील 60 लाख निरापराध ज्यु लोकांची नाझी जर्मनीने अमानुष कत्तल केली. आता मात्र ज्यु लोकांना आत्मरक्षा करता येण्याजोगा स्वातंत्र्य देश निर्माण करण्याची गरज सर्व जगाला जाणवली. 1947 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्यु लोकांच्या मायाभूमीची फाळणी करून ज्यु लोकांसाठी स्वतंत्र्य देश आणि अरबांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अरबांनी त्याला परत विरोध केला. पण दुसऱ्या महायुद्धात अनन्वित अत्याचार झालेल्या ज्यु लोकांसाठी संपूर्ण जगाने लावलेल्या रेट्यामुळे 1948 साली इस्राईल या नवीन देशाची स्थापना झालीच. लगेच शेजारील इजिप्त, सिरिया, ट्रान्सजॉर्डन, लिबेनोन, इराक, सौदी अरेबिया, येमेन या अरब राष्ट्रांनी मिळून ईस्राएलवर हल्ला केला. इस्राईलने सर्व अरब राष्ट्रांचा एकत्रित पराभव केला. आपले पहिले स्वातंत्र्ययुद्ध इस्राईलने महत प्रयासने जिंकले. त्यानंतर जगभरातून ज्यु आपल्या मायभूमीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागले. अरब लोक इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न करत राहिले. दहशदवादी गटांकडून छोटे मोठे हल्ले तर सतत चालूच होते. पण शेजारील अरब देशांनी 1956 ला सुवेज कॅनल युद्ध, 1967 ला सहा दिवसाचे युद्ध, 1973 चे योनकिपरचे युद्ध करून इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इस्राईलने या सर्व युद्धात अरबांचा पराभव करत आपले अस्तित्व टिकवले.
ज्यु लोकांनी कायम आपल्या मायभूमीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. इतकेच नव्हे तर अमाप कष्ट करून त्या वाळवंटात नंदनवन फुलवले. कमी पाण्यात केले जाणारी इस्राईली शेती आणि औद्योगिक प्रगती जगतमान्य आहे. इस्राईलची संरक्षण दले आणि गुप्तचर यंत्रणांची जगात दहशद आहे. मध्यपूर्व भागात तेल नसलेले एकमेव प्रगत राष्ट्र असा लौकिक इस्राईलने मिळवला आहे.
एकेश्वरवादी ज्यु लोकांनी स्वतःचा धर्म संभाळला. पण त्यांनी इसाई आणि मुस्लिम लोकांसारखा आक्रमक धर्मप्रचार केल्याची उदाहरणं फारशी ऐकीवात नाहीत. पण त्यांनी आपली वेगळी धार्मिक ओळख म्हणजे अहंकार जपला. त्यात ज्यु समाज कायम आर्थिक दृष्टया प्रगत होते. त्याचा फटका त्यांना वारंवार बसला. आर्थिक प्रगती करणे समाजमान्य आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा सरळ तिरस्कार करता येत नाही. काहीतरी वेगळे कारण शोधावे लागते. ज्यु लोकांनी जपलेले धार्मिक वेगळेपण त्यांच्या तिरस्काराचे कारण झाले.
‘नंगे से खुदा डरता है’ असे म्हणतात. पण ज्यु लोक कधीच भूखे किंवा नंगे नव्हते. व्यक्तीजवळ गमावण्याजोगे काही असेल तर व्यक्ती जरा घाबरूनच राहतो. ज्यु लोकांच्या अशा व्यापारी स्वभावामुळे त्यांना कधी कुणी घाबरले नाही. त्यामुळे ज्यु लोक सॉफ्ट टार्गेट झाले. त्यांच्या धर्मिक वेगळेपणाच्या आधारावर जगभर त्यांचा छळ झाला. नंगाडपणातून येणारी सत्ता आणि ताकत असल्याशिवाय संपत्ती टिकवता येत नाही. हे सत्य हिंदूप्रमाणे ज्यु लोकांनाही उशिरा उमगले. आजही सुसंस्कृत आणि सधन असललेले ज्यु इस्राईल बाहेर फारसे आक्रमक नाहीत. चालुबाजूनी ज्यु द्वेष्ट्या मुस्लिम अरब राष्ट्रानीं वेढलेल्या इस्राईल मध्ये ते आक्रमक राहिले नसते तर कधीच त्यांचे अस्तित्व नष्ट केले गेले असते.
जगभरात सर्वत्र फ्रस्ट्रॅटेड लोक आढळतात. त्यांच्या आत सुरु असलेली खदखद बाहेर काढण्यासाठी ते सॉफ्ट टार्गेट शोधत असतात. पूर्वीपारपासून ज्यु लोक हे अतिशय सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे इस्राईलवर दहशदवादी हल्ला होऊनही जगभरातील सगळे वैफल्यग्रस्त लोक ज्युं आणि इस्राईल विरुद्ध मोर्चे काढत आहेत. आपले फ्रस्ट्रेशन कमी करायचा प्रयत्न करत आहेत. मनातील दुःख आणि इर्षा कुठेतरी बाहेर पडणारच असते. इतिहासात असेच सर्व लोकांनी सॉफ्ट टार्गेट असलेल्या ज्यु लोकांवर आपले फ्रस्ट्रेशन काढले आहे. पहिल्या महायुद्धाशी ज्यु लोकांचा काहीही संबंध नव्हता. पहिले महायुद्ध हरल्यानंतर जर्मनीत प्रचंड अगतिकता निर्माण झाली. हिटलरने ज्यु लोकांना जर्मनीच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवून ती सगळी अगतिकता काढण्यासाठी वांगे उपलब्ध करून दिले.
इस्लाम आणि इसाई आक्रमक धर्मप्रचार करतात. धर्मप्रचार करताना इतर धर्माना आधी वाईट म्हणावे लागते. त्यामुळे धर्मप्रचार संघर्ष निर्माण होतात. इसाई धर्माला इतर धर्मांचे सहअस्तित्व तरी मान्य आहे. इस्लामला तेही मान्य नाही. ते आजवर मोठमोठया संघर्षाचे कारण ठरले आहे. पण हे दोन्ही धर्म कमालीचे आक्रमक आहेत. प्रतिकारात यांना उलटा मार पडल्यावर पटकन ते व्हिक्टिम कार्ड बाहेर कडून जगभर प्रदर्शने आयोजित करतात. ही कला ज्यु आणि हिंदू लोकांना आजवर जमलेली नाही.
एकेश्वरवादी धर्म सर्वसमावेशक होऊ शकत नाहीत हे सत्य आहे. मी ज्यावर विश्वास ठेवला आहे तेच एकमेव सत्य आहे असा भ्रम झाला की आपल्या सारखा विश्वास असणारे आपले आणि त्या व्यतिरिक्त विश्वास असणारे परके वाटू लागतात. ‘केवळ आपण शहाणे आणि इतर जग बावळट’ इथपर्यंत ठिक आले. इतर लोकांशी संघर्ष होण्याची शक्यता कमी असते. पण धार्मिक नेत्याची ताकत त्याच्या समर्थकांच्या संख्येवरून ठरते. म्हणून ते आपल्या समर्थकांना संपूर्ण जगाला स्वतः सारखे शहाणे करून टाकण्याला म्हणजे धर्माप्रचार करण्याला धर्मकर्तव्य घोषित करून टाकतात. समस्या येथे सुरु होते. जेव्हा आपलाच विश्वास अंतिम सत्य आहे असा मानणारे लोक आपापल्या विश्वासाच्या प्रचारासाठी समोरासमोर समोर येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. सामूहिक धार्मिक ओळखीचा वैयक्तिक फायदा नगण्य असतो. पण या सामूहिक धार्मिक ओळखीचा फायदा धूर्त नेत्याने उचलला तर समूहातील बहुतेक मंडळी नागवले जातात. सामान्य लोकांचे ब्रेन वॉशिंग करून हे धूर्त नेते त्यानां धर्मायुद्धासाठी तयार करतात. असे कडवे सैनिक धर्मासाठी (म्हणजे नेत्यासाठी) लढले की नेत्याचा राजकीय फायदा पक्का होतो. अशा धर्मायुद्धात युद्धात मारतात ती सामान्यांची मुले. सामान्यांच्या मुलांच्या प्रेतांच्या पायऱ्या करून धूर्त नेते मंडळी उच्चं राजकीय पदापर्यंत पोहचतात. त्यासाठी आपल्या समूहाची वेगळी धार्मिक ओळख ते प्रयत्नपूर्वक जपतात. समूहाची धार्मिक ओळख सोडू पाहणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करून इतरांना समूह सोडण्यापासून पराववृत्त केले जाते.
याउलट एका ईश्वराच्या अनेक रूपांना मानणारे हिंदू सारखे लोक ‘एकम् सत् विप्रा बहुदा वदन्ति’ असे म्हणत नवीन लोकांना त्यांच्या आराध्य देवांसहित स्विकारतात. म्हणूनच भारतावर हल्ले करायला आलेले शक, कुषाण, हुण सारखे अनेक लोक सुद्धा त्यांच्या देवा-धर्मासहीत हिंदू जीवन पद्धतीत समाविष्ट झाले. राजकीय संघर्षानंतर होऊ शकणारा मोठा धार्मिक संघर्ष टाळला. परदेशी गेलेले हिंदू तेथील देवांना आपल्या अनेक देवांपैकी एक देव म्हणून सहज स्विकारतात आणि त्या समाजाचा भाग होतात. वेगवेगळ्या लोकांचे आराध्य देव एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे असल्याचा विश्वास असल्याने हिंदूंनी धर्मप्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हिंदू समाज जगभर शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.
कृष्णानेही अधर्मी लोकांविरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगितले. पण सनातन परंपरेत न्यायाने वागण्याला धर्म वा यम म्हटले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय(चोरी न करणे), अपरिग्रह(गरजेपेक्षा जास्त संचयाचा लोभ न करणे) आणि ब्रम्हचर्य(निस्पृहतेच्या ज्ञानमार्गावर चालणे) या पाच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनुष्य वागल्यास त्याचा वैयक्तिक फायदा तर होतो. समाजातील बहुतांश लोक या पाच न्याय तत्वानुसार वागल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. या पाच न्यायतत्त्वांना डावलून समाजातील एखाद्या घटकावरती अन्याय झाल्यास सामाजिक समस्या निर्माण होतात आणि समाज स्वास्थ बिघडते.
सनातन परंपरेत या पाच यमधर्मा प्रमाणे न वागणाऱ्या लोकांना अधर्मी म्हटले जाई. धर्मी आणि अधर्मी या अतिशय वैयक्तिक ओळखी होत्या. ‘न्यायाने अर्थात धर्माने वागणारा’ ही जन्माने येणारी ओळख नव्हे. जन्मावरून कुणाला धर्मी वा अधर्मी म्हणता येत नव्हते. तसे असते तर एकाच कुटुंबात जन्मलेले कौरव अधर्मी आणि पांडव धर्मसंगत ठरले नसते. धर्मी-अधर्मी कर्मावरून ठरते. सनातन समाजात अधर्मी अशी ओळख असणे ही भूषणाची गोष्ट नव्हती. त्यामुळे अधर्मी व्यक्तींच्या समूहाला अधर्मी अशी सामूहिक ओळख देऊन संघटित करणे आणि त्या संघटीत शक्तीचा उपयोग आपला राजकीय फायद्यासाठी करणे हे धूर्त नेत्यांसाठी कठीण होते.
प्रेषितांना अपेक्षित असलेले बहुतेक संघटित ऐकेश्वरवादी धर्म हे वैयक्तिक आत्म उन्नतीचा मार्ग होते. पण नंतरच्या काळात जेव्हा धूर्त अनुयायी या महापुरुषांच्या विचाराचा पराभव करून धर्माचे राजकारण करतात तेव्हा मात्र धर्म अफूची गोळी झाले. नेते गबर झाले आणि धर्माचे सामान्य अनुयायी नागवले गेले. जोपर्यंत सामान्य जनतेला हा खेळ नीट कळत नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार आहे.
वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघं नुकतेच अमेरिकेला राहायला गेलो होतो. तीन-चार महिने झाले असतील. नवरा कामात व्यस्त होता, आठवड्यातून तीन-चार दिवस त्याचा प्रवास चालायचा. घरी मी एकटीच. मला अजून अमेरिका म्हणावी तितकी झेपत नव्हती. सारखी भारताची, घरच्या लोकांची आठवण यायची. त्यात अजून तिथे फार ओळखीही झाल्या नव्हत्या. त्यामुळे एकटेपणा खूप जाणवायचा. त्यात तो सरत्या नोव्हेंबरचा काळ होता. शहरातले सगळे रस्ते, मॉल्स, घरे ख्रिसमसच्या रोषणाईने सजले होते. मला मात्र दिवाळी ह्या वर्षी भारतात साजरी नाही करता आली याचं दुःख होतं आणि त्यामुळे ती रोषणाई बघून अजूनच खिन्न वाटत होतं.
त्यातच आम्ही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाणार होतो. ती सुट्टी ऐन वेळी रद्द करावी लागली होती. कारण नवऱ्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. त्यावरून आमची माफक वादावादीही झाली होती आदल्या दिवशी आणि नवरा सकाळच्या फ्लाईटने त्याच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेलाही होता. घरी मी एकटीच होते, त्यामुळे स्व-अनुकंपेला बऱ्यापैकी वावही होता. सबंध दिवस घरात बसून स्वतःची कीव करून थोडंफार रडूनबिडून झाल्यावर त्याचाही कंटाळा येऊन मी घराबाहेर पडले. तशी माझी जायची ठिकाणं तोपर्यंत दोन-तीनच होती. घराजवळची पब्लिक लायब्ररी, एक मॉल आणि कोपऱ्यावरचं कॉफी शॉप!
मॉलमध्ये जायचं ठरवून तिथे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे सगळं उत्सवी वातावरण होतं. मोठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे रोषणाई, ठिकठिकाणी सेल आणि ऑफर्स. बराच वेळ मी निरुद्देश्य भटकले. पण माझं एकटेपण राहून राहून अंगावर येत होतं. शेवटी चालून चालून पाय दुखायला लागले, तेव्हा मी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शिरले. मला बऱ्याच दिवसांपासून बूट्स घ्यायचे होते, म्हणून बायकांच्या फुटवेअरच्या सेक्शनमध्ये गेले. तिथे एक सत्तरेक वर्षांची कृष्णवर्णीय बाई सेल्सवूमन होती. त्यावेळेला मी एकटीच कस्टमर होते. मला काय हवं ते विचारून ती चपळाईने तिथल्या स्टेप लॅडरवर चढून मला हवे तसे बूट दाखवत होती.
आपल्याला सहसा भारतात इतक्या वयस्कर व्यक्तीकडून सेवा घ्यायची सवय नसते. त्यामुळे तिची लगबग पाहून मला थोडं कानकोंडं होत होतं. बूट दाखवता दाखवता आमचं जुजबी बोलणं सुरु झालं. पॅट्रिस नाव होतं तिचं. ’डू यू नो, आय ऍम सेवेंटी टू?’ ती माझ्या पायात बूट चढवता चढवता म्हणाली. मला अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी तिला सांगितलं, मीच ट्राय करते. बुटांच्या सात-आठ वेगवेगळ्या जोडया तिने आणल्या होत्या आणि गुडघ्यांवर बसून ती मला ते बूट ट्राय करायला मदत करत होती. उठ-बस करताना तिचे गुडघे दुखत आहेत, हे मला जाणवत होतं आणि म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून तिला थँक्स म्हणून मी जायला उठले. तर ती पटकन म्हणाली की तिने विकलेल्या दर जोडीमागे तिला कमीशन मिळतं. ‘यू शुड बाय अ पेअर,’ पॅट म्हणाली.
मी एक बुटांची जोडी पसंत केली. ती पॅक करता करता पॅट बरंच काही बोलत होती. कदाचित माझा एकटेपणा तिला जाणवला होता म्हणून असेल, कदाचित तिलाही बोलायचं होतं म्हणून असेल, पण तिने मला तिची कहाणी सांगितली. तिची पाच मुलं होती, त्यातली शेवटची दोन तिच्याबरोबर रहात होती. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी तिशीची आज मुलगा पस्तिशीचा. दोघेही काही करत नव्हते आणि ही सत्तरीची आई त्यांना सांभाळण्यासाठी दिवसातून दोन-दोन नोकऱ्या करत होती, सकाळी नऊ ते चार एका डॉक्टरच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्सवूमन म्हणून, आणि सुट्टीच्या दिवशी बेबीसीटिंग! हे सर्व बहात्तर वर्षाच्या वयात!
‘साऊंडस सो डिप्रेसिंग!’ तिचं बोलणं ऐकण्याच्या नादात अनवधानाने मी बोलून गेले. पॅट हसली,म्हणाली, ‘हन, आय डोन्ट हॅव दी बँडविडथ टू बी डिप्रेसड, आय हॅव माय हॅंड्स फुल’!
मला एकदम चटका बसल्यासारखं झालं. सगळं व्यवस्थित असून फक्त एक विकेंडची सुट्टी मनासारखी नाही झाली आणि अमेरिकेत एकटेपणा वाटतोय हे स्वतःचं इवलंसं दुःख कुरवाळत मी स्वतःची कीव करत पूर्ण सकाळ घालवली होती आणि ही बहात्तर वर्षांची बाई मला सांगत होती की निराश होऊन रडत बसायला माझ्याकडे वेळच नाहीये!
पॅटचं ते वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आजही कधी छोट्या छोट्या कारणांवरून आपण फार दुःखी वगैरे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हा मी प्रयत्नपूर्वक पॅटचं हे वाक्य आठवते. आपोआपच चित्त ताळ्यावर येतं.
स्व-अनुकंपा आणि स्वतःचे खरे-खोटे दुःख कुरवाळत बसणे हे कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने केलेलं आहे. नव्हे, ते अगदी नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकासाठी त्याच्या किंवा तिच्या अडचणी मोठ्याच असतात आणि त्या त्या वेळेला हतबल वाटू शकतं. ‘हे माझ्याच बाबतीत का होतंय’ असे प्रश्नही पडू शकतात, पण हाताशी असलेला रिकामा वेळ जितका जास्त तितकं ह्या स्व-अनुकंपेमध्ये स्वतःला गुरफटून घेणं जास्त सोपं होतं. जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणाऱ्या, सतत कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला वेळच नसतो.
पूर्वी हा स्व-अनुकंपेचा सोहळा खासगी तरी असायचा. केवळ कुटुंब आणि काही मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोरच हा कार्यक्रम चालायचा. आता सोशल मीडियामुळे दुःख कुरवाळणे हा एक सार्वजनिक इव्हेंट बनत चाललाय. बऱ्याच लोकांसाठी आणि दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. ’मला घरात कुणी समजून घेत नाही’ इथपासून ते ’सासू/सून/नवरा/मुलं/बॉस ऐकत नाही’ इथपर्यंतची सर्व लहान मोठी, खरी-खोटी दुःखे फेसबुकच्या किंवा इन्स्टाच्या चव्हाट्यावर उगाळली जातात.
अशा पोस्टसवर तोंडदेखल्या, खोटया सहानुभूतीचा रतीब घालणारा एक प्रेक्षकवर्ग आहेच, जो ह्या स्व-अनुकंपेच्या रोपट्याला सतत खतपाणी घालून ते जोपासतो आणि मग त्या दुःख कुरवाळत बसण्याची सुद्धा सवय लागते माणसांना. मग कुणी सोल्यूशन दिलेलेदेखील आवडत नाही. कारण मुळात पडलेले प्रश्न सोडवायचेच नसतात, फक्त त्यांचं भांडवल करत मनावरचं दुःखाचं गळू तसंच ठसठसतं ठेवायचं असतं काही लोकांना.
मी ह्या ट्रॅप मध्ये शिरतेय, अशी शंका जरी मला आली तरी मी पॅटचं हे वाक्य मनाशी परत परत आठवते आणि स्वतःला कसल्या ना कसल्या कामात गुंतवून ठेवते. अगदी काही नाही तर दीड-दोन तास चालायला तरी जाते. आपली बरीचशी दैनंदिन आयुष्यातली दुःखं किंवा अडचणी ह्या फुग्यासारख्या असतात, आपण जितकी हवा देऊ तितकी ती फुगत जातात आणि आपण कामाची टाचणी लावली की विरून पण जातात!
लेखिका : सौ. शेफाली वैद्य
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गौरी गाडेकर या एक प्रथितयश कथालेखिका आहेत. त्यांचा कथालेख संख्यात्मकदृष्ट्या जसा चढता वाढता आहे, तसाच तो गुणात्मकदृष्टयाही चढता वाढता आहे. मोजकंच परंतु दर्जेदार कथालेखन त्यांनी केलं आहे. त्यांच्या कथा प्रामुख्याने घटनाप्रधान आहेत आणि बहुसंख्य कथा मध्यवर्गीय जीवनावर आधारलेल्या आहेत, पण त्या साचेबंद नाहीत. एक वेगळं अनुभविश्व, वेगळा आशय आणि व्यक्तिरेखांचं वेगळेपण त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसतं. त्यांच्या नातं या अगदी पहिल्या संग्रहापासून त्यांच्या कथांचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. त्यांच्या कथा आधी मासिकात प्रकाशित झाल्या आणि नंतर पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला आल्या. नातं, आऊटसायडर, सहज व इतर; तिसरं पुस्तक, हनिमून आजी आजोबांचा आणि यानंतर प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे फिनिक्स. या शिवाय वादळातील दीपस्तंभ, मृत्यूवर मात, लिंकन ऑन लीडरशिपही ही त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.
इथे मी विचार करणार आहे, तो ‘फिनिक्स’ या कथासंग्रहाचा. ‘फिनिक्स’ हे मिथक आहे. आपल्याच राखेतून ‘फिनिक्स’ पक्षी पुन्हा भरारी घेतो, असा लोकसमज आहे. इथे हे रूपकही आहे. जीवनातील निराशा, वैफल्य, औदासिन्य यांची राख बाजूला सारून पुन्हा उभारी घेणं, जीवनेच्छा बलवती होणं, आशा, उमेद वर्धिष्णू होणं, हेही ‘फिनिक्स’ पक्षाने राखेतून भरारी घेण्यासारखं आहे, नाही का? संग्रहातील काही कथांमध्ये असे दिसते.
संग्रहातील पहिलीच कथा ‘फिनिक्स’. त्यावरूनच संग्रहाचे नाव दिले गेले आहे, ‘फिनिक्स’. लेखिकेने, बर्याच दिवसांपूर्वी ‘फिनिक्स’ नावाची कविता लिहिली होती. नामसाम्यामुळे ती कविता, लेखिकेने सुरूवातीला दिली आहे. अतिशय सुरेख पण दुर्बोध अशी ही कविता आहे.
विविध रगांच्या विविध स्वभावाच्या, विविध वर्तनाच्या व्यक्तिमत्वांनी त्यांचं कथाविश्व गजबजलेलं आहे. यातील पहिलीच कथा ‘फिनिक्स ‘ अभय तिचा नायक. शाळेत यशस्वी त्याच्या वर्गात येतो आणि नाटकात राजा होण्याची त्याची संधी हुकते. टिपटॉप रहाणारा यशस्वी. अभ्यासात पुढे. परीक्षेत जास्त मार्क. तो कधी मुद्दाम अभयला त्रास देत नाही. पण त्याच्या अस्तित्वाचं दडपण अभयवर येते. त्याचा आत्मविश्वास हरवतो. त्याच्यात न्यूंगंड निर्माण होतो. त्यात पुढे दोन वेळा त्याचं लग्नं मोडतं. इंद्राणीशी साखरपुडा होतो. ती तो मोडून चार दिवसात यशस्वीशी लग्न करते. मग अभय लग्नच करत नाही. बँकेत नोकरीला लागतो. बँकेत कॉम्प्युटर येणार, कळल्यावर आपल्याला जमणार नाही, म्हणून व्ही.आर.एस. घेतो.
त्याच्या चुलत बहिणीच्या सांगण्यावरून एका निवांत गावच्या एका रिझॉर्टमध्ये तो येतो. तिथलं शांत, निवांत वातावरण त्याला आवडतं. एकदा फिरून येताना तो तिथल्या एका वृद्धाश्रमाजवळ येतो. तिथे त्याला यशस्वी आणि त्याचा मुलगा भांडत असलेली दिसतात. त्याची बायको नुकतीच पाच-सात दिवसापूर्वी गेलेली असते. मुलगा त्याचं रहातं घर विकून टाकतो. त्याला वृद्धाश्रमात राहायचं नाहीये, पण मुलगा सक्ती करतोय. अभयच्या लक्षात येतं, ‘बायको गेली. मुलगा, सून, नात असूनही तो एकटा आहे. ना राहायला हक्काचे घर, ना स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अभयला वाटतं, यशस्वी हरला, आपण जिंकलो. ही जाणीव त्याला आंतरिक उभारी देते. परतताना त्याला कॉम्प्युटर इंस्टिट्यूट लागते आणि त्याला वाटतं, आत जाऊन बघूयात तरी. ज्या कॉम्प्युटरच्या धास्तीने त्याने बँकेतील नोकरी सोडलेली असते, ती गोष्ट त्याला करून बघविशी वाटते. इथे त्याच्या मनाने उभारी घेतलेली असते, गेलेला आत्मविश्वास परत येतो, म्हणून कथेचा नाव ‘फिनिक्स’.
‘हक्काचे घर’ ही कथासुद्धा कथानायकाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या भरारीने ‘फिनिक्स’च्या कल्पनेशी जवळीक जोडते. प्रमोद त्याचा दादा आणि वाहिनी चाळीतल्या एका खोलीत रहात असतात. फ्लॅटमध्ये राहायचे वाहिनीचे स्वप्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते काही शक्य नाही. तेव्हा वाहिनी ठरवते, जो फ्लॅट देईल, त्याच्या मुलीशीच दिराचे लग्न करायचे. अर्थात प्रमोदला हे मान्य नाही. गावची मुलगी सांगून येते, तेव्हा, तो पळून जाऊन तिच्याशी लग्न करतो. तिथे सासरच्या घरी दोन खोल्या भाड्याने घेऊन रहातो. सासर्याच्या दुकानात काम करतो. गावच्या लोकांचा गरजेच्या वेगवेगळ्या वस्तू दुकानात ठेवतो. दुकानाची भरभराट त्याच्यामुळे होते. पुढे तो स्वत:चे स्वतंत्र दुकान काढतो. संधी मिळताच एक जुना बंगला विकत घेतो. त्याला थोडी डागडुजी, रंगारंगोटीते करतो. बंगला नवा होतो. वास्तुशांतीला दादा- वहिनींना आणतो. सहा खोल्यांचा बंगला पाहून दोघेही खुश होतात. थाटात वास्तुशांत होते. दादा आजारी असतो. रात्री तो जातो. बंगल्यात राहण्याचे नाही, पण स्वत:च्या हक्काच्या घरात मरण्याचे त्याचे स्वप्न पुरे होते. प्रमोद म्हणतो, ‘डोक्यावर छप्पर मिळालं, पण नियतीने डोक्यावरचं छत्रच काढून घेतलं.’
विविध प्रकारच्या आणि नमुन्याच्या व्यक्ती या संग्रहात आपल्याला भेटतात. सासूच्या (कुसुमच्या) कथा आपल्या नावावर देणारी सून (प्रिया) इथे आहे. (गुपीत) तुझा खोटेपणा मी जगासमोर आणीन, असं कुसुम म्हणताच ती उपहासाने म्हणते, ‘कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? मी सांगीन माझंच हस्तलिखित यांनी चोरलं.’ मी आता कथा लिहिणारच नाही, असं कुसुम म्हणते, तेव्हा प्रिया उद्दामपणे म्हणते, जोपर्यंत तुम्ही माझ्या उपयोगाच्या असाल, तोपर्यंतच इथे मुलाजवळ, नातींजवळ राहू शकाल, नाही तर तुमची गावी रवानगी होईल. शेवटी कुसुमला नावापेक्षा, मुला-नातींचा सहवास महत्वाचा वाटतो आणि ती म्हणते, ‘हे गुपीत गुपीत ठेवण्यातच सगळ्यांचं हीत आहे.’
कुणाच्या खांद्यावर’ मधील नायिका ज्योती आपल्या प्रियकराच्या मुलांचं सांभाळ करायचं ओझं आपल्या खांद्यावर घेते. त्यांची आई होऊन त्यांना वाढवते. मोठं करते. प्रकाश आणी ज्योती लग्न करणार असतात, पण त्याची अम्मी आत्महत्या करण्याची धमकी देऊन प्रकाशचं लग्न, गावातल्या चित्राशी करतात. पुढे त्यांना दोन मुले होतात. एका अपघातात प्रकाश आणि चित्रा दगावतात. मग प्रकाशची आई ज्योतीला बोलावते. तिच्यावर अन्याय झाला म्हणून तिची क्षमा मागते आणि प्रकाशच्या मुलांना सांभाळ म्हणून सांगते. अन्यथा आपल्याला या वयात ही जबाबदारी पेलणार नाही. मुलांना अनाथाश्रमात ठेवावं लागेल, असं म्हणते. आपल्या प्रकाशची मुले अनाथाश्रमात वाढणार, हा विचार ज्योतीला सहन होत नाही आणि ती मुलांची आई होते. दीपिकाचे लग्न होते. नीरव प्रणालीशी लग्न ठरवतो. मग ती प्रणालीला सगळी हकिकत सांगते. प्रणालीही सासूसारखी जगावेगळीच. ती नीरवला सुचवते, ‘तुमची जबाबदारी आता संपलीय, आता तरी त्यांना स्वत:चं आयुष्य जगू दे. आपण त्यांच्यासाठी योग्य जोडिदार शोधू या.’
‘सेवाव्रती’ ही आल्हाद आणि प्रसाद या भावांची गोष्ट. प्रसाद आदिवासींसाठी कार्य करतोय. त्याला ‘सेवाव्रती’ पुरस्कार मिळालाय, पण खरा ‘सेवाव्रती’ आल्हाद्च कसा आहे, हे लेखिकेने कथेत रंगवलय. कथेच्या शेवटी आल्हादच्या सोडून गेलेल्या बायकोचा अपर्णाचा फोन येतो, ती म्हणते, ‘ प्रसादला पुरस्कार मिळाला… आनंद झाला. पण मला वाटतं, सेवाव्रती…खरे सेवाव्रती तुम्ही आहात. खूप चांगले आहात तुम्ही …. सामान्य माणसांना पेलवणार नाही, एवढे चांगले …..म्हणूनच मलाही…’
लोळा-गोळा झालेल्या मुलाला त्याचे कपडे काढून उन्हात-पावसात त्याला सार्वजनिक ठिकाणी झोपवून स्वत: निवांत सावलीत बसणारा, त्याच्या जिवावर पैसे गोळा करणारा स्वार्थी बाप इथे आहे. (गोळा). कडक शिस्तीची, कर्तव्य कठोर, तत्ववेत्ती प्राध्यापिका इथे आहे. एका क्षणी तिला जाणीव होते, ‘आपण ज्याला विजय समजत होतो, ती प्रत्यक्षात शिक्षा होती एकांतवासाची. नातलगांपासून दूर, भाव-भावनांच्या, प्रेमस्नेहाच्या खिडक्या नसलेल्या एका अंधार कोठडीत कैद होतो आपण’ ही जाणीव तिला होते. आपल्या नातवाचंही भविष्य असं घडू नये, या विचाराने ती बदलते.
‘स्त्रीणाम् भाग्यम्’ मध्ये आरतीच्या दोन मैत्रिणींच्या कथा आहेत. दोघींचा जीवन प्रवास परस्पर विरुद्ध दिशेने होतो. दोघी तिच्या चौथीच्या वर्गातल्या मैत्रिणी. . तज्ज्ञा देखणी, हुशार,, टिपटॉप रहाणारी, श्रीमंत. तर सुभद्रा गरीब. बावळट, आजागळ. तज्ज्ञाला बारावीत मार्क कमी मिळतात. ती डॉक्टर होण्याचे वडलांचे स्वप्न भंग होते. मग ती तिला सहानुभूती दाखवणार्या मुलाशी लग्न करते. मग गरिबी तिच्या गळ्यात माळ घालते. आरतीला ती अनेक वर्षांनी भेटते, तेव्हा ती अगदीच बावळट, आजागळ अशी दिसते. याउलट वर्गात बावळट, आजागळ दिसणारी सुभद्रा, संधी मिळताच फिनिक्सप्रमाणे भरारी घेते. आपलं व्यक्तिमत्व सुधारते. शिकते. पुढे चटपटीत एअर होस्टेस होते. दोघींचा दोन दिशांना होणारा प्रवास लेखिकेने छान रंगवलाय.
पत्नी अपघातात गेल्यानांतर, तिच्या डायर्या वाचल्यावर आपण तिच्या मनाचा, इच्छांचा विचार केला नाही, तिला सतत गृहीत धरले, यामुळे पश्चत्तापदग्ध झालेला पती ‘तू बोललीच नाहीस’मधे भेटतो, तर ‘एकुलती’ मध्ये सतत स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारी केतकी किरकोळ कारणावरून कार्तिकला घटस्फोट द्यायचं ठरवते, अन वडलांच्या आजारपणात कार्तिकने केलेली धावपळ, त्यांची सेवा-सुश्रुषा यामुळे तिचं मतपरिवर्तन होतं. अशा अनेक विविध रंगांच्या, स्वभावाच्या, विविध वर्तन करणार्या व्यक्ती यातील कथांमधून भेटतात.
कथासंग्रहातील कथांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यातील संवाद चटपटीत आहेत. हे संवाद आणि घटना-प्रसंगांचं यथार्थ वर्णन, यामुळे त्या त्या व्यक्ती आणि ते ते प्रसंग साक्षात डोळ्यापुढे उभे रहातात.
पुस्तक अतिशय वाचानीय आहे. सर्वांनी वाचून यातील कथांचा आनंद घ्यावा.
परिचय –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈