श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  उनका एक आलेख -संस्मरण  देवकुंड वारी  ।)

 

☆ देवकुंड वारी  ☆

 

वसंतात वसुंधरने

हिरवी शाल ओढली

पावसाच्या अमृत धारेने

अवघी सृष्टी खुलली

कोकण दर्शन तेही पावसाळ्यात करतांना वरिल ओळी सहज सुचुन जातात. आजचे अनुभव हेच उद्याची आठवण बनून रहातात. आणि या आठवण मालिकेचे भाग रोजच अनुभवायला मिळतात. असाच माझा एक अनुभव “देवकुंड वारीचा”. देवकुंड धबधबा तसा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करणारा. आणि आषाढ म्हटला म्हणजे पर्यटकांना ती निसर्ग सफरीची मेजवानीच असते. याच मेजवानीचा आस्वाद मी आणि माझे सवंगडयांनी पुरेपुर घेतला.

मागच्या शनिवारी आमची देवकुंड वारी झाली. माझा मित्र, मित्र काय जिवच म्हणा. मित्र आणि परिवारात भेद न करणारा. आणि घरच्या सदस्यांप्रमाणे मैत्री निभावना-या माणसाला अजुन काय म्हणणार ?  तसं उगाच कोणाला महान बनवणारा माझा स्वभाव नाही. पण माणुस जरी योग्य असला तर बनवायला हरकतही नाही. त्याला बनवण्याची गरज नसते. तो असतो. असो.

शनिवार, रविवार दोन दिवस त्यांच्या कंपनीला सुटी होती. या सुटीचा आनंद घ्यावा. म्हणुन त्याने आणि त्याच्या कंपनीच्या मित्रांनी मिळुन हा भन्नाट प्लॅन केला. मला ज्यावेळी मेहुल आणि सागरने सांगीतलं तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. कारण नवनवीन ठिकाणी विषेशतः निसर्गरम्य ठिकाणी जाणं आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं मला खुप आवडते. म्हणुन माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी सहाला रूमवरून निघालो. खबरदारी म्हणुन सागरने भेळ घेतली. आणि मेहुलने चटणी-पोळ्या घेतल्या. जवळपास एक तास वाट पाहिल्यानंतर एकतानगरच्या बस स्टॉप वर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो. वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेले आमचे मित्रांना सोबत घेतले. तोपर्यंत नऊ वाजले होते. पुण्याच्या बाहेर एका हाॅटेलवर थांबून नाश्ता केला. आणि नऊ वाजेच्या सुमारास आमची गाडी देवकुंडच्या दिशेने निघाली. बाहेरचं वातावरण पावसाचं होतं. पाऊस अधुन मधुन रिमझीम तर कधी जोरदार पडत होता. वातावरणात गारवा, पर्वत माथ्यावर जमलेले ढग, आणि पृथ्वीच्या पाठीवर पसरलेली हिरवाई असं निसर्गाचं सौदर्य न्याहाळत आम्ही निघालो होतो. दरम्यान एका ठिकाणी गाडी थांबवली. तेथे छानपैकी धुकं जमलं होतं. रस्त्याच्या कडेने पाणी वाहत होतं. तेथे काही वेळ घालवला. फोटो सेशनही झाले. आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तत्पूर्वी पाटणुस या गावी आम्हाला गावात नुसतं प्रवेश करण्याचे प्रत्येकी दहा रूपये द्यावे लागले. आम्हाला नवल वाटले. पण ‘जैसा देश वैसा भेस’ असं करत पैसे दिले. आणि पावती घेऊन निघालो.

पुढे गेल्यावर गाडी पार्क केली. धबधब्याकडे जाणा-या मुख्य रस्ताजवळ पोहोचलो. तेथे आमच्याही आधी बरीच गर्दी जमा झालेली होती. तेथे जाऊन आम्हाला कळले कि येथेही प्रत्येकी पन्नास रुपयांची पावती घ्यावी लागेल. त्या पावतीसाठी आम्ही बराच वेळ तेथे उभे राहीलो. अगदी बोअर झालं होतं सगळ्यांना. नंतर कसंतरी आम्हाला पावती भेटली आणि शेवटी आमची स्वारी धबधब्याच्या दिशेने निघाली. जाण्यासाठी पायवाट होती. पाऊस सुरू असल्याने  चिखल झाला होता. तसाच चिखलाचा कधी दगडाचा तर कधी डोंगरातुन वाहत्या पाण्याचा रस्ता तुडवत जंगलातून आम्ही साधारणतः दिड तासाच्या जंगल सफारीनंतर धबधब्याजवळ पोहोचलो. दरम्यान आमचे काही मित्र दुस-या रस्त्याने पळाले होते. ते पोहोचले तेव्हा आमचं फोटोसेशन सुरू होतं. मेहुल आणि त्याच्यासोबत आलेले मुलं पाण्याच्या पलिकडे होते. म्हणुन पाण्यात उतरलो आणि दुस-या बाजुला गेलो.

सगळेजण सोबत झालो तेव्हा आम्ही पाण्याशी मनसोक्त मस्ती केली. फोटो काढत असतांना तोल जाऊन त्या पाण्यात एक माणुस वाहुनही चालला होता. पण काही दुर वाहत गेल्यावर पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तो थांबला. त्याला पाण्यातुन काढण्यात आले. आम्हीही पाण्यासोबत खेळून थकलो होतो.

एक तर वरून पडणारे पावसाचे पाणी आणि धबधब्याचे थंड पाणी यांची जुगलबंदी मला महागात पडली. मला खुप थंडी भरली होती. ती एवढी कि मला पाण्याचा एक थेंबही नको वाटत होता. आणि परततांना पुन्हा ते पाणी पार करून पलिकडे जावे लागणार होते. सर्वांनी केलेही. पण मी मात्र जाण्याच्या स्थितीत नव्हतो. मी जेव्हा सागरला म्हटले कि मला खुप थंडी वाजतेय. तेव्हा मला त्याने परत जायला सांगीतले. दोनदा मी  पाण्यातुन परत आलो. तेव्हा त्यांच्या कंपनीचे प्रोडकशन मॅनेजर विकास सरांनी मला पाण्याच्या बाहेर काढले. आम्ही परत यायला निघालो. यावेळी रस्त्यात चिखल अधिक झाला होता. आणि जाणा-या येणा-यांची गर्दीही वाढली होती. बाकीची मुलं पुढे पळत निघुन गेले. मागे आम्ही विकास सर, आकाश सर, सागर, सुजीत, मेहुल आणि मी असे काही जण राहीलो होतो.

एका ठिकाणी बसुन आम्ही सोबत आणलेली भेळ आणि पोळीवर ताव मारला. सागरने जेव्हा सांगीतले की कपिल कविता लिहीतो. तेव्हा स्वाभाविकच एखादी चारोळी ऐकायचं मन होतंच तसं विकास सरांनी मला म्हटलंही कि या वातावरणात तुला सुचत असलेली एखादी कविता एकवं. पण खरं तर माझी मनस्थिती तशी राहीली नव्हती. म्हणुन त्यांना चारोळी ऐकवू शकलो नव्हतो.

चिंब भिजलीय पावसात अवनी

झाला आहे हिरवाईचा गजर

उंच अशी ही पर्वतराजीही गुलाबी झालीय

घेऊनी लाजेने ढगांचा  पदर

पर्वतमाथ्यावर निर्भिडपणे फिरणा-या ढगांना पाहुन असं वाटत होत कि, एखाद्या नव्या नवरीने लाजुनी डोक्यावर पदर घ्यावा तसा त्या पर्वतावर ते ढग भासत होते. आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ते सौदर्य अगदी मोहक दिसत होते. आम्ही परत गाडीजवळ आलो. ओले कपडे बदलून कोरडे कपडे घातले. आणि परतीच्या  प्रवासाला लागलो. घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले होते. पण दिवसभरात जो अनुभव आला तो अविस्मरणीय होता. अगदी न विसरता येणारा असा. आणि हाच अनुभव उद्याची  अविस्मरणीय आठवण बनून नेहमीच स्मरणात राहील…..

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
लसणे रंजना

सुंदर लेखन .घरी बसूनच देवकुंडची वारी घडली,

Kapil indave

आपन दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद